व्हीएसआरएस न्युज कोरोना लसीकरणानंतर सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) लागू करण्याच्या तयारीत असलेल्या मोदी सरकारला रविवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी इशारा दिला.
‘हम दो, हमारे दो’ जरा लक्ष देऊन ऐका. काहीही झाले तरी सीएए लागू करू देणार नाही. आसामला तोडू शकेल अशी जगात कुठलीच शक्ती नाही, अशा शब्दांत त्यांनी भाजपच्या षड्यंत्रावर जोरदार हल्ला चढवला.
राहुल गांधी हे आसाम दौऱ्यावर आहेत. त्यांनी रविवारी शिवसागर जिल्ह्यात सभा घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. व्यासपीठावरील काँग्रेस नेत्यांनी ‘नो सीएए’ उल्लेख असलेला गमछा परिधान केला होता. राहुल यांनी गमछा दाखवत मोदी सरकारवर शरसंधान साधले.
आम्ही हा गमछा परिधान केला आहे. त्यावरील सीएएवर क्रॉस मारला आहे.
याचा अर्थ काहीही घडू दे, सीएए लागू होणार नाही असा इशारा देतानाच त्यांनी आसाम विभाजनासंबंधी भाजपच्या कारस्थानाचे वाभाडे काढले. जर कुणी आसाम कराराला हात लावण्याचा वा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला तर काँग्रेस पक्ष व जनता मिळून त्यांना धडा शिकवेल, असा इशारा त्यांनी दिला.
राहुल गांधींच्या टीकेला आसामचे मंत्री व भाजप नेते हेमंत सरमा यांनी प्रत्युत्तर दिले. आज कुणीही सीएएची चर्चा करीत नाही. तुम्ही सोशल मीडिया चेक करू शकता. आम्ही तरुणींना स्कुटी दिली तसेच तरुणांना टू-व्हिलर दिली जाईल याचीच आजकाल सोशल मीडियात चर्चा केली जातेय. काँग्रेस 50 वर्षे मागे आहे व जुने मुद्दे उचलतोय, असा आरोप सरमा यांनी केला.