व्हीएसआरएस न्युज पिंपरी- जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा आषाढी वारी 336 वा पालखी सोहळा परंपरेप्रमाणे यावर्षी व्हावा, अशी मागणी तीर्थक्षेत्र देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी (दि. 8) मुंबई येथे करण्यात आली. तसे निवेदन संस्थानद्वारे त्यांना देण्यात आले आहे.
यंदाची आषाढी पायी वारी सोहळा गुरुवारी (दि.1 जुलै) श्री क्षेत्र देहू येथून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. सुमारे तीन शतकांहून अधिक काळ हा आषाढी वारीतील पालखी सोहळा परंपरेप्रमाणे पायी जात आहे.
ही परंपरा अखंडित रहावी आणि पायी सोहळा व्हावा यासाठी आषाढी पायी वारीस जैवसुरक्षा कवचामध्ये (बायो बबल) धर्तीवर नेण्यास परवानगी द्यावी. वारीमध्ये सहभागी होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कोविड टेस्ट केली जाईल. तसेच सोहळा सोडून इतर बाहेरील व्यक्तीच्या संपर्कात जाणार नाही. सोहळ्याबाहेरील व्यक्ती पालखीतील वारकऱ्यांच्या संपर्कात येणार नाही, याची दक्षता घेण्यात येईल. दर्शनासाठी नागरिकांची गर्दी होऊ नये यासाठी पालखी रथाऐवजी बंदिस्त वाहनातून श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुका नेण्यात येतील. पालखी सोहळ्यातील वारकरी पालखी मार्गानेच देहू ते पंढरपूर व पंढरपूर ते देहू अशी पायी वाटचाल करतील. तसेच देहू ते पंढरपूर हा वीस दिवसांचा तसेच पंढरपूर ते देहू पायी प्रवास काही दिवसांचा कमी करण्याचा आणि वेळेनुसार रात्रीचा प्रवास करण्यात येईल. त्यामुळे भाविक वारकऱ्यांचा विचार व्हावा. शासनास संस्थानच्या वतीने सहकार्य करण्यात येईल. मात्र, यंदाची पायी वारी ही अखंडित व्हावी, अशी मागणी संस्थानच्या वतीने विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या वेळी संस्थानचे अध्यक्ष हभप. नितीन महाराज मोरे, पालखी सोहळाप्रमुख हभप भानुदास महाराज मोरे, हभप अजित महाराज मोरे, हभप संजय महाराज मोरे, विश्वस्त हभप माणिक महाराज मोरे, हभप संतोष महाराज मोरे, हभप विशाल महाराज मोरे यांच्यासह विविध संस्थानचे पदाधिकारी, विश्वस्त, वारकरी महामंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.