व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांची मुंबईत बैठक झाली.
यावेळी सारथी संस्थेला निधीची कुठलिही कमतरता पडू देणार नाही, असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं.
सारथी संस्थेच्या योजनांसाठी निधीची कुठलीही अडचण येऊ देणार नाही. सारथी संस्थेने गरीब, गरजू नागरिकांपर्यंत योजना पोचवून त्या लाभार्थ्यांची संख्या वाढवावी. तसेच आरक्षणाच्या निकालामुळे विविध शासकीय नोकऱ्यांमध्ये नियुक्तीच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठा समाजातील तरुणांना नियुक्ती देताना आर्थिक भार सोसण्यास शासन तयार आहे, असं अजित पवार म्हणाले.
सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असून आम्ही पूर्णपणे सकारात्मक आहोत. बैठकीनंतर आंदोलक प्रतिनिधींनी देखील मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांच्या या भूमिकेचं स्वागत केलं तसेच पुढे देखील प्रश्नांची सोडवणूक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास व समाजाच्या मागण्यांवर राज्य शासन नेहमीच सकारात्मक राहिले आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या मागण्यांवर राज्य शासन कार्यवाही करत आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाविरुद्ध पुनर्विचार याचिका येत्या काही दिवसात दाखल करण्यात येणार आहे. तसेच इतर पर्यायांचाही कायदेशीर विचार सुरू आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले.
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत खासदार संभाजीराजे यांची मुंबईत बैठक झाली. त्या बैठकीत मराठा आरक्षणासह मांडलेल्या 11 मागण्यांपैकी 6 मागण्या मान्य झाल्या आहेत.
बैठकीत, मराठा आरक्षण व मराठा समाजाच्या 6 मुख्य मागण्यांसंदर्भात सकारात्मक आणि सविस्तर चर्चा करण्यात आली. मराठा आरक्षण मिळवून देण्यासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं सतेज पाटील यांनी सांगितलं आहे.
मराठा समाजासाठी महत्वाच्या असलेल्या या सर्व मागण्या गतिमान पद्धतीने मार्गी लावण्यासाठी विशेष समिती स्थापन करून शासनाकडून प्रधान सचिव विकास खर्गे यांच्या सोबत वेळोवेळी बैठक घेण्यात येणार असल्याचं देखील या बैठकीत ठरवण्यात आलं आहे.
Discussion about this post