व्हीएसआरएस न्युज खासदार राजीव सातव यांचे कोरोनामुळे निधन झाल्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी काँगेस पक्षाने अनपेक्षितपणे माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.
वास्तविक, या जागेसाठी सातव यांच्या पत्नी प्रज्ञा यांना संधी देण्यात यावी, अशी मागणी मोठय़ा प्रमाणावर होत होती. मात्र, काँगेसने मराठवाडय़ातील रजनी पाटील यांनाच संधी दिली. गंमतीचा भाग म्हणजे, राज्यसभेच्या या जागेसाठी इच्छुक असलेल्या काँगेस सरचिटणीस मुकुल वासनिक यांनीच याबाबतची माहिती पत्रकाद्वारे दिली.
राजीव सातव यांच्या निधनामुळे राज्यसभेच्या एका जागेसाठी पोटनिवडणूक होत आहे. राजीव सातव हे काँगेस नेते राहुल गांधी यांचे निकटवर्तीय होते. त्यामुळे काँगेस नेतृत्व सातव यांच्या पत्नीलाच राज्यसभेची संधी देईल अशी अटकळ होती. प्रज्ञा सातव यांनी राजधानीत काँगेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी व काँगेस नेते राहुल गांधी यांची भेट घेऊन तशी इच्छाही प्रदर्शित केली होती. तसेच राज्यातील काँगेस नेत्यांच्याही त्यांनी मध्यंतरी गाठीभेटी घेतल्या होत्या. काँगेस कुटुंब तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असा शब्द काँगेस नेत्यांनी त्यावेळी दिला होता. मात्र, ऐनवेळी उमेदवारी रजनी पाटील यांना देण्यात आली आहे. रजनी पाटील या बीडच्या माजी लोकसभा खासदार असून राज्यसभेच्याही त्या एक वेळा खासदार राहिल्या आहेत.
याच जागेवर भाजपकडून संजय उपाध्याय निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली आहे. राज्यसभा भाजप लढणार आहे. मुंबई भाजपचे सरचिटणीस संजय उपाध्याय हे आमचे राज्यसभेचे उमेदवार असतील. 22 तारखेला सकाळी 11 वाजता ते फॉर्म भरायला जाणार आहेत, अशी घोषणा पाटील यांनी केली.
Discussion about this post