व्हीएसआरएस न्युज पिंपरी राज्यात ओमायक्रॉनच्या आणखी 23 रुग्णांची नोंद झाली आहे. यापैकी 6 रुग्ण पुण्यातील, 7 रुग्ण पिंपरी-चिंचवड, मुंबईत 5 , उस्मानाबादेत दोन रुग्ण, ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईदर येथील प्रत्येकी एक रुग्ण आहे.
आतापर्यंत राज्यात ओमायक्रॉनच्या 88 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 42 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
मुंबई विमानतळावर सापडलेल्या नऊ रुग्णांपैकी दोन रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी एक रुग्ण हा छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहेत. आज सापडलेल्या 23 रुग्णांपैकी 18 रुग्णांचे पूर्ण लसीकरण झाले आहे. तर एकाचे लसीकरण झालेले नाही. तर चार रुग्ण लसीकरणासाठी पात्र नाहीत.
पिंपरी चिंचवडमध्ये आणखी सात ओमयक्रोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण झाले आहे. यात दोन नेदरलँड, एक साऊथ आफ्रिका, एक दुबई, एक सिंगापूर तर दोन संपर्कात आलेल्यांचा समावेश आहे. यापैकी दुबई, सिंगापूर आणि संपर्कातील दोघे हे एकाच कुटुंबातील आहेत. त्यामुळं आता शहरातील ओमयक्रोन पॉझिटिव्हची संख्या 19 वर पोहचली असून, दहा जणांनी ओमयक्रोन वर मात केलेली आहे.
पुढच्या वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, गोवा, पंजाब, हिमाचल प्रदेश, गुजरात या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग आणखी वाढविण्यास केंद्र सरकारने त्या राज्यांना सांगितले आहे. ओमायक्रॉनमुळे संसर्ग झपाट्याने वाढत असून त्यामुळे राज्यांनी अतिशय दक्ष राहावे, असेही केंद्राने म्हटले आहे. येत्या काही महिन्यांत विधानसभा निवडणुका होऊ घातलेल्या राज्यांत कमी लसीकरण झालेल्या ठिकाणी संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे अशा भागांत लसीकरणाचा वेग वाढवा अशी केंद्राने त्या राज्यांना सूचना केली आहे. सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी कोरोना स्थितीवर बारीक लक्ष ठेवावे, जिथे जास्त संख्येने नवे रुग्ण आढळत असतील तिथे कडक निर्बंध लागू करावेत असे केंद्रीय आरोग्य खात्याने म्हटले आहे. नाताळ व नववर्षाच्या कार्यक्रमात मोठी गर्दी होऊन संसर्ग अधिक पसरू शकतो. हे लक्षात घेऊन अशा कार्यक्रमांवर दिल्ली सरकारने यंदा बंदी घातली आहे. कोणतेही निर्बंध किमान १४ दिवस लागू करा असेही केंद्राने राज्यांना कळविले आहे.
संसर्ग रोखण्यासाठी मध्य प्रदेशमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. असा निर्णय इतर राज्यांतही घेतला जाण्याची शक्यता आहे. ज्या ठिकाणी नव्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळेल तिथे कडक निर्बंध लागू करा अशा सूचना केंद्र सरकारने याआधीच राज्यांना दिलेल्या आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य खातेही कोरोना स्थितीचा वारंवार आढावा घेत आहे.
Discussion about this post