व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी -मागील दोन वर्ष जगभरात कोरोनाने थैमान घातला होता, यामुळे देशात सार्वजनिक उत्सवांवर बंदी घालण्यात आली होती. यात मागील दोन वर्षात आषाढी वारी देखील प्रातिनिधिक स्वरुपात करण्यात आली होती.
कोरोनाच्या निर्बंधांमुळे वारकऱ्यांना पायी वारीसाठी परवानगी नाकारण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर यंदाच्या वर्षी आषाढी वारी निर्बंधमुक्त होणार आहे. आषाढी वारीवरचे सर्व निर्बंध प्रशासनाकडून हटवण्यात आले आहेत. या निर्णयामुळे दोन वर्षाच्या खंडानंतर वारकऱ्यांना पायी वारी करता येणार आहे.
या निर्णयामुळे वारकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झालंय. मंगळवार दिनांक २१ जून रोजी सायंकाळी ४ वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी आळंदी येथून प्रस्थान करणार असल्याचे निश्चित झालंय.
दरम्यान, श्री क्षेत्र पंढरपूर येथील संत ज्ञानेश्वर महाराज मठात बाळासाहेब आरफळकर यांच्या अध्यक्षतेखाली आषाढी वारी नियोजनाची बैठक झाली. यावेळी याबाबत माहिती देण्यात आली आहे.
मंगळवार दिनांक 21 जून रोजी सायंकाळी 4 वाजता श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा आळंदी येथून प्रस्थान ठेवणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. बुधवार दिनांक 22 आणि गुरुवार दिनांक 23 रोजी पुणे, शुक्रवार दिनांक 24 आणि शनिवार दिनांक 25 रोजी सासवड, रविवार दिनांक 26 रोजी जेजुरी, सोमवार दिनांक 27 रोजी वाल्हे, मंगळवार दिनांक 28 आणि बुधवार दिनांक 29 रोजी लोणंद, गुरुवार दिनांक 30 रोजी तरडगांव, शुक्रवार दिनांक 1 आणि शनिवार दिनांक 2 जुलै रोजी फलटण, रविवार दिनांक 3 रोजी बरड, सोमवार दिनांक 4 रोजी नातेपुते, मंगळवार दिनांक 5 रोजी माळशिरस, बुधवार दिनांक 6 रोजी वेळापूर, गुरुवार दिनांक 7 रोजी भंडीशेगाव, शुक्रवार दिनांक 8 रोजी वाखरी तर शनिवार दिनांक 9 रोजी श्री क्षेत्र पंढरपूर मुक्कामी सोहळा पोहोचेल. रविवार दिनांक 10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा होणार आहे. पालखी सोहळ्यात चांदोबाचा लिंब, बाजीराव विहीर आणि इसबावी येथे उभे रिंगण तर पुरंदावडे (सदशिवनगर), पानीव पाटी, ठाकुरबुवा आणि बाजीराव विहीर येथे अश्वांचे गोल रिंगण होणार आहे.
Discussion about this post