पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | बारावीच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी परीक्षेत गंभीर चूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. इंग्रजी विषयाच्या प्रश्न पत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 3 च्या A3 to A5 या क्रमांकाच्या प्रश्नाऐवजी थेट उत्तर छापण्यात आल्याने बोर्डाच्या कामाची गंभीर चूक समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि सचिव अनुराधा ओक यांनी संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना त्रुटी दूर करून योग्य न्याय दिला जाईल, असे म्हटले आहे.
राज्यात मंगळवारपासून (दि. २१) बारावी बोर्डाची परीक्षा सुरु झाली आहे. कोविडनंतर यंदा प्रथमच १०० टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा होत आहे. राज्यातील 3 हजार 195 केंद्रावर ही परीक्षा आयोजित करण्यात आली असून राज्यात जवळपास साडेचौदा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मात्र, परीक्षेच्या पहिल्याच दिवशी इंग्रजी विषयात ही गंभीर चूक समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
यावर खुलासा करताना राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी यासंदर्भात एक जाहीर पत्रक काढले आहे. ओक यांनी सांगितले की, प्रचलित पद्धतीप्रमाणे इंग्रजी विषयाच्या शिक्षकांची विषय तज्ज्ञ् आणि विभागीय मंडळाच्या प्रमुखांबरोबर सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, शिक्षकांचा आपल्या धोरणात्मक मागण्या संदर्भात बहिष्कार असल्याने आजची सभा झाली नाही. त्यामुळे आजची सभा पुन्हा एकदा बोलावण्यात येईल. त्यात आज पार पडलेल्या इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील त्रुटी बाबत दखल घेतली जाईल. संयुक्त सभेच्या अहवालानुसार राज्यातील विद्यार्थ्यांना योग्य न्याय दिला जाईल. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करू, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण अशा एकूण नऊ विभागीय मंडळामार्फत या लेखी परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. १० हजार ३८८ कनिष्ठ महाविद्यालयात ही परीक्षा होत आहे. यामध्ये विज्ञान शाखेचे ६ लाख ६० हजार ७८० विद्यार्थी, कला शाखेचे 4 लाख ४ हजार ७६१ विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे ३ लाख ४५ हजार ५३२ विद्यार्थी तर आयटीआयचे ३ हजार २६१ विद्यार्थी असे एकूणपुणे विभागात १४ लाखांहुन अधिक विद्यार्थी ही लेखी परीक्षा देत आहेत.
तर राज्यात सर्वाधिक मुंबई विभागीय मंडळात ३ लाख ४० हजार ९५३ विद्यार्थी तर पुणे विभागीय मंडळात २ लाख ४८ हजार ३५७ विद्यार्थी परीक्षा देत आहे. तर सर्वात कमी कोकण विभागीय मंडळात २६ हजार ४२३ विद्यार्थी ही परीक्षा देत आहे.
Discussion about this post