व्हीएसआरएस मराठी न्युज -वंदे भारत एक्सप्रेस सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान धावणार आहे. यासह देशात वंदे भारत गाड्यांची संख्या 8 झाली आहे. यावेळी पंतप्रधान मोदींनी देशवासियांना मकर संक्रांत आणि पोंगलच्या शुभेच्छा दिल्या. पंतप्रधान म्हणाले की, ही वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन तेलंगणा-आंध्र दरम्यानचा वारसा जोडण्याचे काम करेल. श्रद्धा आणि पर्यटनाशी संबंधित ठिकाणे रेल्वेच्या मार्गावर येतात, त्यामुळे भारत धार्मिकदृष्ट्याही मजबूत होईल.
वंदे भारत ट्रेन नवीन भारताच्या संकल्पाचे प्रतीक आहे. सिकंदराबाद ते विशाखापट्टणम दरम्यान वंदे भारत एक्सप्रेसमुळे पर्यटनाला चालना मिळणार आहे. आज भारतीय रेल्वेचा प्रवास पूर्वीपेक्षा अधिक आनंददायी होत आहे. भाजपने गेल्या 7 ते 8 वर्षात सुरू केलेली कामे रेल्वेला पूर्णपणे नवसंजीवनी देणारी आहेत, असंही यावेळी मोदी म्हणाले.
या कार्यक्रमाला सिकंदराबाद स्टेशनवर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव, केंद्रीय पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी आणि तेलंगणाचे राज्यपाल टी सुंदरराजन उपस्थित होते. या ट्रेनमध्ये 14 एसी चेअर कार आणि दोन एक्झिक्युटिव्ह एसी चेअर कोचसह 1,128 प्रवासी बसण्याची क्षमता आहे.
रेल्वे सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणम-सिकंदराबाद एक्सप्रेस (20833) विशाखापट्टणम येथून सकाळी 5.45 वाजता सुटेल आणि दुपारी 2.15 वाजता सिकंदराबादला पोहोचेल. तर, सिकंदराबाद-विशाखापट्टणम ट्रेन (20834) सिकंदराबादहून दुपारी 3 वाजता सुटेल आणि रात्री 11.30 वाजता विशाखापट्टणमला पोहोचेल.
Discussion about this post