व्हीएसआरएस मराठी न्युज -खासदार संजय राऊत यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी आता १० ऑक्टोबरला होणार आहे. त्यामुळे संजय राऊतांचा दसराही कारागृहातच जाणार आहे.
गोरेगाव येथील पत्रा चाळ जमीन गैरव्यवहारप्रकरणी अंमलबजाणी संचालनालयाने ( ईडी) ३१ जुलै रोजी संजय राऊत यांना अटक केली होती. संजय राऊत यांनी जामीन मिळावा यासाठी ईडीच्या पीएमएलए न्यायालयात अर्ज दाखल केला होता. त्यावर आज ( २७ सप्टेंबर ) सुनावणी पार पडली. मात्र, आजच्या सुनावणीत संजय राऊत यांना दिलासा मिळाला नाही आहे. आता जामीन अर्जावरील सुनावणी १० ऑक्टोंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे.
आरोपपत्रानुसार, २००६-०७ मध्ये पत्रा चाळीच्या पुनर्विकासाबाबत तत्कालीन केंद्रीय कृषीमंत्री व तत्कालीन मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली दोन बैठका झाल्या होत्या. त्यात संजय राऊत म्हाडा अधिकारी व इतरांसह सहभागी झाले होते. त्यानंतर राकेश वाधवान या प्रकरणात सहभागी झाले. या प्रकरणात नियंत्रण राहावे म्हणून संजय राऊत यांनी प्रवीण राऊत यांना मोहरा म्हणून मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचा संचालक केले. सोसायटी, म्हाडा आणि मेसर्स गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात त्रिपक्षीय करार झाला होता, असेही ईडीने आरोपत्रात म्हटलं आहे.
Discussion about this post