व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी पिंपरी-
आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा
पुणे :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार आपल्याला करणे आवश्यक आहे. वारकरी संप्रदायातील मान्यवरांची मते आज जाणून घेण्यात आली आहेत, वेळप्रसंगी अधिक चर्चा करुन आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रीमंडळाच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी चर्चा करुन पालखी सोहळ्याबाबत त्यांची मते जाणून घेतली. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे (व्हीसीद्वारे), आमदार अतुल बेनके, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी- चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद उपस्थित होते. तर व्हिडीओ कॉन्फरन्सीद्वारे सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंग, सोलापूर जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर, देहू संस्थानचे विश्वस्त माणिक मोरे, नितीन मोरे, पालखी सोहळा प्रमुख संजय मोरे, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अँड विकास ढगे-पाटील, अभय टिळक यांच्यासह राज्यभरातील वारकरी संप्रदायातील पालखी सोहळा प्रमुख व मान्यवर उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह पंढरपूरच्या आषाढी पायी वारीला वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व आहे. या वारीला शेकडो वर्षांची पंरपरा आहे, मात्र राज्यात कोरोनाचे संकट आहे, कोरोनासोबतच म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अशा स्थितीत अत्यंत काळजी घ्यावी लागणार आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे गेल्या सव्वा वर्षापासून आपण सर्व धार्मिक कार्यक्रम घरात राहूनच साजरे केले आहेत. आषाढी वारीची पंरपरा जपण्यासाठी आपण सर्वांनी मांडलेली भूमिका मंत्रीमंडळाच्या येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीत मांडण्यात येईल. मंत्रीमंडळाच्या बैठकीत याबाबत सर्वानुमते अंतिम निर्णय घेण्यात येईल. गेल्यावर्षी राज्य सरकारच्या आवाहनाला वारकरी सांप्रदायाने चांगला प्रतिसाद दिला, ही कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, यांनीही वारकरी संप्रदायातील मान्यवरांशी संवाद साधला. यावेळी संस्थानच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनांवर चर्चा करण्यात आली. यावेळी वारकरी संप्रदायातील मान्यवर उपस्थित होते.
दरवर्षी तहान भूक विसरून नामस्मरणाच्या गजरात न चुकता पंढरीची पायी वारी आणि आषाढी एकादशीला विठुमाऊलीचं डोळे भरून दर्शन ही वारकऱ्यांच्या दृष्टीने जीवनाच्या सार्थकतेची व्याख्या म्हटले तर वावगे ठरणार नाही. पण मागच्या वर्षी कोरोना संकटामुळे विठुरायाच्या लेकराची पायी वारी चुकली. वर्षभर ही सल उराशी घेऊन काढल्यावर यंदा तरी पायी वारी घडेल अशी आशा आहे. मागच्यावर्षी राज्य शासनाने मानाच्या पालख्यांना एसटी बसने मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थितीत पंढरीला जाण्याची परवानगी दिली होती.
या कठीणप्रसंगी वारकरी संप्रदायाने मोठ्या संयमाचे दर्शन घडविले. मात्र यंदाच्या वर्षी वारकऱ्यांकडून पायी वारीची मागणी जोर धरू लागली आहे. प्रातिनिधिक स्वरूपात का होईना पण पायी वारी पंढरीला जाऊ द्या अशी मागणी वारकरी राज्य शासनाकडे करणार आहे.
यंदा २० जुलै रोजी आषाढी एकादशी असून १ जुलैला संत तुकाराम महाराज पालखी सोहळा तर २ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याचे प्रस्थान आहे. मात्र, अजूनही राज्यातील अनेक जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरली नसल्याने मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. यात सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्ह्यात देखील कोरोनाची साथ असल्याने यंदा आषाढी यात्रा कशी घ्यायची हा पेच सरकारच्या पुढे आहे.
पुण्यात पुणे जिल्ह्यातील संत तुकाराम महाराज व श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे नियोजन कण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा पालक मंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील शुक्रवारी (दि.28) रोजी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत वारकरी पायी वारीची मागणी करणार आहेत. मात्र, वारीबाबत काय निर्णय घेतात याकडे वारकरी समाजासह संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे गेल्या वर्षी एसटी बसने आषाढी यात्रेला पालखी सोहळे आणावे लागल्यानंतर यंदा मात्र पायी पालखी सोहळ्यासाठी वारकरी संप्रदाय आक्रमक झाला आहे. कोरोनाचे निर्बंध चालतील मात्र बंदी नको, अशी भूमिका वारकरी संप्रदायाने घेतली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देहू, आळंदी आणि इतर मानाच्या सात पालखी सोहळा संस्थांशी चर्चा करणार असून यातून मार्ग निघेल अशी वारकरी संप्रदायाला अपेक्षा आहे.