व्हीएसआरएस न्युज आकुर्डी श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यानिमित्त हजारो वारकरी शहरात दाखल होतात. हा पालखी सोहळा वर्षानुवर्षांच्या परंपरेनुसार आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात विसावा घेतो. पंढरपूरसारखा वैभवशाली सोहळा पिंपरी चिंचवडमध्ये पालखी आल्यानंतर साजरा होतो. दरवर्षी पालखी विठ्ठल मंदिरात आल्यानंतर टाळ-मृदंगांचा गजर, भगव्या पताका यांनी मंदिर परिसर गजबजलेला असतो.
आकुर्डीतील विठ्ठल मंदिर हे वतनवारी पद्धतीने कुटे कुटुंबीयांकडे आहे. कुटे कुटुंबीय तसेच नागरिक वारकऱ्यांची सेवा करतात. एखाद्या लग्न सोहळ्यासारखे वातावरण मंदिर परिसरात असते. मात्र, कोरोनामुळे दुसऱ्या वर्षी पालखी सोहळा अनुभवता येणार नाही, अशी भावना नगरसेवक प्रमोद कुटे यांनी
व्यक्त केली.
याबाबत कुटे म्हणाले, की पालखी आकुर्डी विठ्ठल मंदिरात विसावते तेव्हा जवळपास ३० ते ४० हजार बारक्यांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था केली जाते. मध्यरात्री आणि पहाटे चार वाजता आरती केली जाते. त्यानंतर पालखी मार्गस्थ होते. वारकऱ्यांसाठी काम करताना आपण प्रत्यक्ष सेवा करतो असे वाटते. प्रत्यक्ष विठ्ठलच आपल्याकडे मुक्काम करतो ही भावना असते. त्यामुळे त्याच्या सेवेत कोणतीही
कमतरता येऊ नये असा प्रयत्न असतो. वारीचा मुक्काम एक रात्र असतो. पहाटे चार वाजता आरती केल्यांनतर पालखीला निरोप देताना मन भरून येते. सलग दुसऱ्या वर्षी मंदिरात वारीचा मुक्काम नाही. त्यामुळे मंदिरातील टाळ, मृदंग व भजनाचे सूर हरवले आहेत;असे व्हीएसआरएस न्युजशी बोलताना म्हणाले,
Discussion about this post