व्हीएसआरएस न्युज पिंपरी- गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये कोरोनाची लाट काहीशी ओसरायला सुरुवात झाली होती. लॉकडाऊन देखील शिथिल करण्यात आला होता.
परंतु मार्च 2021 पासून पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढण्यास सुरुवात झाली. यात शहरांबरोबरच ग्रामीण भागात देखील कोरोनाचा प्रसार मोठ्याप्रमाणावर झाला. अनेकांची बेड मिळविण्यासाठी तर अनेकांची ऑक्सिजन मिळविण्यासाठी धावाधाव झाली.
त्यातच पंढरपूरमध्ये झालेल्या पोटनिवडणुकीमुळे तिथली रुग्णसंख्या वाढल्याचेही आरोप झाले.
सध्या राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी ती समाधानकारक नाही. त्यामुळे लाखो वारकऱ्यांच्या उपस्थित होणारी वारी यंदासुद्धा एसटी बसमधून होणार की पायी होणार याबाबत स्पष्टता नाही. वारी सोहळ्यातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
नियम तयार करून निवडक वारकऱ्यांच्या उपस्थित पायी वारी करण्यात यावी अशी वारकरी सांप्रदायाची भावना असल्याचं ज्ञानेश्वर महाराज संस्थान समितीचे प्रमुख विश्वस्त अभय टिळक यांनी सांगितलं.
टिळक म्हणाले, “गेला महिनाभर सर्वांसोबत आम्ही विचार विनिमय करत आहोत. शासनाने काही नियम जरुर घालावेत परंतु आम्हाला पायी चालण्याची परवानगी द्यावी अशी वारकऱ्यांची भावना आहे. या पायी वारीत वारकऱ्यांची संख्या किती ठेवायची, काय निकष लावायचे याबाबत शासनाशी चर्चा करणार आहोत. परंतु गेल्या वर्षी पादुका या बसमधून नेण्यात आल्या होत्या, तसं यंदा न होता पायीच वारी व्हावी अशी सगळ्यांची भावना आहे.”
“गेल्या वर्षी कोरोनावर ठराविक उपचार पद्धती नव्हती. सध्या कोरोना रुग्णांवर कसे उपचार करावेत याबाबत उपचार पद्धती ठरविण्यात आली आहे. सध्या रुग्णसंख्या देखील कमी झाली आहे. त्यामुळे 500 लोकांच्या उपस्थितीत पायी वारी करवी” असं संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे प्रमुख संजय मोरे यांनी सांगितलं.
मोरे म्हणाले, “700 वर्षांची पायी वारीची परंपरा आहे. गेल्या वर्षीची परिस्थिती पाहता शासनाला आम्ही सहकार्य केलं. यंदा 350 दिंड्यांचा एक प्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी यांच्यासोबत पायी दिंडीची परवानगी मिळावी अशी आमची मागणी आहे.”
“यात प्रत्येकाची कोव्हिड चाचणी करावी तसंच लसीकरण देखील करावं. त्याचबरोबर या पाचशे लोकांच्या व्यतिरिक्त कोणी यात सामील होणार नाही अशी खबरदारी घेण्यात यावी.”
सातही पालखी प्रमुखांची ऑनलाईन बैठक झाली त्यात देखील सर्वांनी पायी वारी करण्यात यावी असंच मत व्यक्त केल्याचे देखील मोरे यांनी सांगितलं.