व्हीएसआरएस न्युज अतिवृष्टीसह पुरबाधित व्यावसायिकांना अवघ्या 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. सामाजिक बांधिलकी राखत जिल्हा सहकारी बँकांनी पुढाकार घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत काल (बुधवारी) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी आहे की, राज्यातील पुणे, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरग्रस्त भागातील बाधित दुकानदार, व्यावसायिक, टपरीधारकांना दिलासा देण्यासाठी राज्यसरकारच्यावतीने पात्र बाधितांना सरसकट 50 हजार रुपयांची मदत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय यापूर्वीच घेतला आहे. त्याचबरोबर या बाधित व्यावसायिकांना पुन्हा उभे करण्यासाठी सामाजिक बांधिलकी राखत तेथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकांनी पुढाकार घेतला असून ना नफा तत्वावर अत्यंत कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करुन देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत आज घेण्यात आला. दरम्यान या निर्णयाचा फायदा राज्यातील अतिवृष्टी आणि पूरबाधित दुकानदार, व्यापारी, टपरीधारकांना होणार असून त्यांना केवळ 5 ते 6 टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होणार आहे.
मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांसंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, नियोजन विभागाचे अप्पर मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, वित्त विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, मदत आणि पुनर्वसन प्रधान सचिव असीम गुप्ता, सहकार विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार, सहकार आयुक्त अनिल कवडे, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक अजित देशमुख यांच्यासह सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकांचे चेअरमन, मुख्य कार्यकारी अधिकारी व्हिसीव्दारे उपस्थित होते.
Discussion about this post