व्हीएसआरएस न्युज पिंपरी- रमाबाई भीमराव आंबेडकर या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पहिल्या पत्नी होत्या. आंबेडकरानुयायी त्यांना आईची उपमा देत रमाई संबोधतात. माता रमाई यांनी जीवनात फारच दुःख सहन करावे लागले. बाबासाहेब हे शिक्षण घेत असताना रमाईंनी अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत संसार सांभाळला. रमाईंनी अठ्ठावीस वर्षे बाबासाहेब आंबेडकर यांना साथ दिली.
रमाबाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी 1897 रोजी दाभोळजवळील वंणदगावाच्या एका गरीब कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील भिकू धुत्रे व आई रुक्मिणी यांच्यासह रमाबाई वंणदगावात नदीकाठी महारपुरा वस्तीमध्ये राहत. त्यांना 3 बहिणी व एक भाऊ होता. रमा लहान असतानाच त्यांच्या आईंचे आजारपणाने निधन झाले. काही दिवसात वडील भिकू यांचेही निधन झाले. पुढे वलंगकर काका व गोविंदपुरकर मामा मुलांना घेऊन मुंबईला भायखळा मार्केटच्या चाळीत रहायला गेले.
रमाई व भीमरावांचे लग्न भायखळ्याच्या भाजी मार्केटमध्ये इ.स. १९०६ या वर्षी झाले. विवाहप्रसंगी बाबासाहेबांचे वय १४ वर्षे तर रमाईचे वय ९ वर्षे होते. लग्नानंतर रमीचे नाव रमाबाई झाले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अध्ययनात व्यत्यय येऊ नये म्हणून त्या राजगृहाच्या प्रवेशद्वारावर तासनतास बसून राहायच्या. बाबासाहेबांना कोणी भेटायला आल्यावार त्यांच्याशी तितक्याच अदबीने वागत, “साहेब पुस्तकाच्या कोंडाळ्यात आहेत, नंतर भेटा.” असे म्हणत. आलेल्याची रवानगी करताना त्याचे नाव, गाव, कामाचे स्वरूप, पुन्हा कधी येणार आहात, हे सारे एका नोंदवहीत टिपण्यास सांगत.
१९२३ साली बाबासाहेब लंडनला गेले असताना रमाईची खूप वाताहत होत होती. त्या दुष्काळाच्या आगीत होरपळत असताना बघून बाबासाहेबांच्या कार्यकर्त्यांना काही पैसे जमा केले व ते पैसै रमाईला देऊ केले. त्यांनी त्यांच्या भावनांचा आदर केला पण ते पैसे स्वीकारले नाहीत. स्वाभिमानी रमाई जिद्दीने गरिबीशी भांडत होत्या.
परदेशात जाऊन ज्ञानसाधना करणाऱ्या बाबासाहेबांना मात्र रमाईने कधी आपल्या दु:खाची झळ पोहचू दिली नाही. पती परदेशात शिक्षणासाठी गेल्यावर रमाई एकट्या पडल्या होत्या. रमाईने आपल्या निष्ठेने, त्यागाने आणि कष्टाने स्वतःच्या संसाराचा गाडा हाकलून बाबासाहेबांना ध्येय गाठण्यासाठी मदत केली.
रमाईची शरीर काबाड कष्टाने पोखरुन गेल होते. रमाईचा आजार बळावला होता. १९३५ च्या जानेवारी महिन्यापासून रमाईचा आजार वाढतच चालला होता. मे १९३५ ला तर आजार खूपच विकोपाला गेला. बाबासाहेबांनी सर्व नामांकित डॉक्टरांना पाचारण केले. औषधोपचारही लागू होत नव्हता. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापासून बाबासाहेब आजारी रमाईच्या जवळ बसून राहू लागले. आजारी रमाई त्यांच्याकडे एकटक बघत असत. बोलण्याचा प्रयत्न करीत असत; पण अंगात त्राण नसल्यामुळे त्या बोलू शकत नव्हत्या. त्यांना स्वतः बाबासाहेब औषध देत असत आणि कॉफी किंवा मोसंबीचा रस स्वतःच्या हाताने पाजण्याचा प्रयत्न करीत असत.
खूप प्रयत्न करुनही त्यांचा आजार काही केल्या बरा झाला नाही आणि बाबासाहेबांवर दुःखाचा फार मोठा आघात झाला. दादरच्या राजगृहासमोर लाखो लोक जमले होते. यशवंताबरोबर दीनांना पोरका करणारा दिवस उजाडला. २७ मे १९३५ रोजी सकाळी ९ वाजता रमाईची प्राण ज्योत मावळली. सर्व परिसर आकांतात बुडाला. कोट्यवधी रंजल्या गांजल्याची रमाई माता त्यांना अंतरली होती. दुपारी २ वाजता रमाईची प्रेतयात्रा वरळी स्मशानाकडे निघाली. आम्हा दुरावली मायेची सावुली. निर्वाण पावली आमची रमाई माऊली.
पहाडासारखा महामानव बाबासाहेब ढसाढसा रडले. जवळ जवळ तीस वर्षांच्या संसारात प्रेमाने व धैर्याने भक्कम सोबत देणार्या रमाबाई मध्येच अचानक सोबत सोडून न परतीच्या वाटेने कायमच्या दूर निघून गेल्या आणि बाबासाहेब आपल्या संसारात अगदी एकाकी झाले.
रमाताई बराच काळ आजारी राहिल्या आणि शेवटी 27 मे 1935 रोजी जेव्हा बाबासाहेब डॉ. भीमराव आंबेडकर कोर्टातून परत आले तेव्हा रमाबाईंनी बाबा साहेबांना स्वत: कडे इशार्याने बोलावले त्यांच्या हातात हात देत म्हणाल्या की, पाहा, मला वचन द्या की माझे निधन झाल्यानंतर आपण निराश होणार नाही, आपली मुले जगू शकली नाहीत, मात्र समाज आपले स्वतःचे मूल आहे; मला वचन द्या की तुम्ही त्यांना ब्राह्मणवादी व्यवस्थेतून मुक्त कराल, असे सांगून माता रमाबाईंनी डॉ. आंबेडकरांना सोडून या जगाचा निरोप घेतला. रामाताईंच्या निधनामुळे डॉ. आंबेडकर तीव्र शोकग्रस्त झाले.