व्हीएसआरएस न्युज प्रतिनिधी -पिंपरी, दि. २८ (प्रतिनिधी)महापालिकेतील सत्ताधारी केवळ घोषणांचा पाऊस पाडत आहेत. लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांना ३ हजार रुपये, १५ लाख लसीचे डोस देऊ, प्लाझ्मा दान करणाऱ्यांना ३ हजार रुपये आदीसह विविध घोषणा केल्या. मात्र अद्याप शहरवासीयांना त्याचा लाभच मिळाला नाही.
त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जनतेची फसवणूकच केली असल्याची टीका माजी आमदार विलास लांडे यांनी केली आहे.
लांडे यांनी म्हटले आहे की, सत्ताधाऱ्यांनी एच. ए. कंपनीला २५ कोटी देण्याची घोषणा केली. सध्या कंपनीलालसनिर्मितीसाठी केंद्रातूनच परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची २५ कोटींची घोषणा हवेतच विरणार असल्याचे चित्र आहे. केंद्र सरकारकडून परवानगी मिळवून देण्यासाठी सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. तसेच लॉकडाऊनमध्ये कष्टकऱ्यांना ३ हजार रुपये मदत देण्याचा गाजावाजा केला. मात्र, अद्याप एक दमडीही त्यांना दिली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजीचा सूर आहे. कोविडच्या लसींचा साठा अपुरा पडत आहे. १५ लाख लसींचा डोस देण्याची घोषणा सत्ताधाऱ्यांनी केली. मात्र, अद्याप त्याचा देखील साठा पुरेसा उपलब्ध नाही. सध्या प्लाझ्मा वापरू नये असे तज्ज्ञ सांगत आहेत.
ही थेरपी देखील बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्लाझ्मादात्यांना प्रोत्साहन निधी देण्याचे शहाणपण सत्ताधाऱ्यांना उशिरा सुचले. मात्र, ते देखील दिले नाही. कोविडच्या नियोजनात सत्ताधाऱ्यांना अपयश आल्याचे लांडे यांनी म्हटले आहे.