व्हीएसआरएस मराठी न्युज -महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंण्ड ॲग्रीकल्चरचे सुवर्ण महोत्सवी वर्ष व देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव हा अनोखा संयोग आहे; हा संयोग केवळ नाशिकलाच नाही तर संपूर्ण देशाला औद्योगिक क्षेत्रात सुवर्ण युगाकडे घेवून जाणारा ठरेल.
विकासाच्या नव्या युगात प्रवेश करण्यासाठी औद्योगिक क्षेत्राची भूमिका महत्वाची आहे. त्याबरोबर उद्योजकांनी स्वत:च्या प्रगतीसोबत सामाजिक विकासासाठीही आपले योगदान देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले आहे.
आज येथील कालीदास कलामंदिरामध्ये आयोजित महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲंण्ड ॲग्रीकल्चरच्या सुवर्ण महोत्सवी वर्ष प्रारंभाच्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून राज्यपाल श्री. कोश्यारी बोलत होते. यावेळी राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ, महसुल मंत्री बाळासाहेब थोरात, खासदार हेमंत गोडसे, उन्मेश पाटील (जळगांव), आमदार देवयानी फरांदे, डॉ. राहुल आहेर, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., महानगरपालिका आयुक्त रमेश पवार, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललीत गांधी, उमेश दशरथी, सुधाकर देशमुख आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना राज्यपाल श्री. कोश्यारी म्हणाले, नाशिकचा देवभूमी, यंत्रभुमी म्हणून विकास होताना आर्थिक विकासाचा संकल्प यानिमित्ताने प्रत्येकाने करावयास हवा. उद्योजक, लोकप्रतिनिधी, प्रशासक या तिघांच्या समन्वयातून शाश्वत विकासांची पायाभरणी आपण करू शकतो. औद्योगिक क्षेत्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या कामगार वर्गाला आवश्यक अशा सोयीसुविधांचा विचार करून त्या पुरविण्यावर भर देणे आवश्यक आहे. त्याप्रमाणे आज महिला देखील प्रत्येक क्षेत्रात त्यांचे स्थान अधोरेखित करत असतांना चेंबर्समध्ये महिलांचा सहभाग वाढविणे गरजेचे आहे. त्यामुळे व्यापक प्रमाणात औद्योगिक विकास होण्यास हातभार लागेल, असेही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी सांगितले.
या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष श्री. गांधी यांनी ५० वर्षातील चेंबर्स ऑफ कॉमर्सची झालेली प्रगतीशील वाटचालीची माहिती दिली. कार्याक्रमा प्रसंगी नाशिक विभागातील उद्योग क्षेत्रातील विविध मान्यवरांचा विकास रत्न म्हणून राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
Discussion about this post