Mumbai News : मुंबई : खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल बाबर यांचे ३० जानेवारी रोजी सांगलीतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले.ते ७४ वर्षांचे होते. गेले काही दिवस ते न्युमोनियाने आजारी होते.
आमदार बाबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे एकनिष्ठ आमदार होते. शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला.काँगेस, राष्ट्रवादी आणि त्यानंतर शिवसेना असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला.
त्यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शोक व्यक्त केला आहे.
आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने आपण खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वारसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या आहेत. अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही प्रशासनाला दिल्या आहेत.
मुख्यमंत्री आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, आपल्या खानापूर-आटपाडी मतदारसंघांमध्ये त्यांनी शिवसेनेचे केलेले कार्य कधीही न विसरण्याजोगे आहे. सांगली जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागामध्ये पाणी आणण्यासाठी आणि सिंचनासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. कृष्णा खोऱ्यातील पाणी आणि टेंभू योजना कार्यान्वित व्हावी म्हणून ते सतत झगडत होते.
बेघरांना घरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे किंवा शिक्षण संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचा तळागाळापर्यंत केलेला प्रसार असो, अनिल बाबर यांनी एक आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून काम केले. खानापूर -आटपाडी भागामध्ये शेतकऱ्यांच्या समस्यांसाठी अनिल बाबर हे कायम एका लढाऊ वृत्तीने लढले. त्यांनी या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अथक प्रयत्न केले. त्यांच्या निधनाने शिवसेनेचा एक ज्येष्ठ लोकप्रतिनिधी, माझा जवळचा सहकारी आणि मार्गदर्शक आम्ही गमावला आहे, असेही मुख्यमंत्री आपल्या शोक संदेशात म्हणतात.
ज्येष्ठ नेते, आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने पाणी प्रश्नासाठी तळमळीने काम करणारा नेता हरपला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक संघर्षशील अध्याय संपला आहे. जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लढणारे, विधिमंडळात जोरदार आवाज उठवणारे निर्भिड नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार अनिल बाबर यांना श्रद्धांजली अर्पण केली.
उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात की, खानापूर-आटपाडी मतदारसंघातील पाणी प्रश्नासाठी सातत्याने लढा देणाऱ्या आमदार अनिल बाबर यांचे जीवन संघर्षशील होतं. त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरुन लोकशाही मार्गाने आंदोलने केली. त्यांची विधिमंडळातील अभ्यासपूर्ण भाषणे तरुण आमदारांसाठी मार्गदर्शक होती. त्यांच्यासारख्या नेतृत्वाचे निधन ही महाराष्ट्राच्या राजकारणाची, पाणी प्रश्न चळवळीची मोठी हानी आहे. आमदार अनिल बाबर यांचे जीवन हे राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना सदैव मार्गदर्शन, प्रेरणा देत राहील, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दु:ख व्यक्त करुन श्रद्धांजली वाहिली आहे.
बाबर यांच्या निधनामुळे आज होणारी कॅबिनेट मीटींग तहकूब करण्यात आली आहे. मुख्यमंत्री बाबर यांच्या अंत्यविधीस उपस्थित राहणार आहेत.
Discussion about this post