Pimpri News : पिंपरी : पिंपरी डेअरी फार्म येथील रेल्वे उड्डाणपुलामध्ये अडथळा निर्माण करणारी 142 झाडे तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाला पर्यावरणवाद्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर प्रशासनाने मवाळ भूमिका घेतली आहे. 142 पैकी 64 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
पुलाला अडथळा निर्माण करणारी झाडे तोडण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मंजुरी दिली होती. या निर्णयाविरोधात पर्यावरणवाद्यांनी आवाज उठवला. झाडे तोडण्याऐवजी पुनर्लागवड करण्याची मागणी त्यांनी केली. तेव्हा प्रशासनाने काही झाडे पुनर्रोपण करणार असल्याचे सांगितले होते. वाहतूक कोंडी कमी करून, वृक्षांचे पुनर्रोपण करून आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या कमी करून पर्यावरणीय समस्या सोडवणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे. नैसर्गिक पर्यावरणाचे महत्त्व ओळखून, स्थानिक वनस्पती आणि जीवजंतूंवर बांधकाम प्रक्रियेचा प्रभाव कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वृक्ष प्राधिकरण समितीने संरक्षण विभागाच्या जमिनीवरील झाडांचे मूल्यांकन केल्यानंतर झाडे तोडण्यास तसेच पुनर्रोपण करण्यास मान्यता दिली आहे. त्यात सुब्बूल, बाबूल, गुलमोहर आणि बरसाती या 142 झाडांचा समावेश आहे. यातील 64 झाडांचे पुनर्रोपण करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले.
पिंपरी परिसरातील नागरिकांची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी डेअरी फार्म येथे असलेल्या मुंबई-पुणे रेल्वे फाटकावर ५६५ मीटर लांबीचा रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम सुरू आहे. दापोडी-निगडी रोड ते पॉवर हाऊस चौकाला जोडणारा उड्डाणपूल झपाट्याने वाढणाऱ्या लोकसंख्येची वाढती मागणी लक्षात घेऊन बांधण्यात येत आहे. या चारस्तरीय उड्डाणपुलाची क्षमता लहान वाहनांबरोबरच अवजड वाहनेही वाहून नेण्याची असेल. या पुलाच्या बांधकामामुळे पिंपरी, पिंपळे सौदागर, रहाटणी परिसरातील प्रवाशांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे. या प्रकल्पामुळे नागरिकांची सोय, सुरक्षितता आणि इंधन बचतीच्या दृष्टीने फायदा होणार असल्याचे आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले.
Discussion about this post