Pune News : पुणे : दोन वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर बीएसएनलच्या सल्लागार समितीची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत सदस्यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना बीएसएनएल प्रशासनाला केल्या.
बैठकीचे अध्यक्षस्थान खासदार वंदना चव्हाण यांनी भूषविले होते.समितीचे सदस्य डॉ. लालबाबू गुप्ता आणि बीएसएनएलचे पुणे क्षेत्र महाप्रबंधक अनील धानोरकर उपस्थित होते.
या बैठकीत डॉ. लालबाबू गुप्ता यांनी अनेक महत्त्वपूर्ण सूचना केल्या. समितीच्या सदस्यांना ओळखपत्र मिळावे, मोफत टेलिफोन कनेक्षन दिले जावे या महत्वाच्या सूचना त्यांनी केल्या. त्याच बरोबर बीएसएनएलच्या दयनीय कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करत ग्राहकांच्या बाबतीत असलेली उदासीनता अधोरेखित करत त्यांनी यात सुधारणा होण्याची शक्यता आहे का? असल्यास कधी होणार? असे प्रश्न यावेळी उपस्थित केले. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना सर्व सदस्यांनी सहमती दर्शविली.
यावेळी बोलताना डॉ. लालबाबू गुप्ता यांनी बीएसएनएलच्या प्रगतीच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या विषयांना स्पर्श केला. सध्या फोर जी मागे पडून फाय जी कडे दूरसंचार क्षेत्र चालले आहे. या स्पर्धेच्या युगात बीएसएनएलने कार्यक्षमतेत सुधारणा करणे आवश्यक आहे. त्यासाठी ग्रामीण भागात टॉवर्सची संख्या वाढवावी त्यामुळे ग्रामीण ग्राहक बीएसएनएलकडे वळू शकतो या गोष्टीकडे त्यांनी धानोरकर यांचे लक्ष वेधले.
बैठकीच्या अध्यक्ष वंदना चव्हाण यांनी ही बाब अत्यंत महत्त्वाची असल्याचे मत व्यक्त केले. सर्व सदस्यांनी केलेल्या सूचनांचा गांभीर्याने विचार करून भविष्यात तोट्याचे नफ्यात रुपांतर कसे करता येईल याचा निश्चितच विचार केला जाईल, कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील असे आश्वासन त्यांनी सभासदांना दिले.
कनेक्षन घेतल्यानंतर सेवा नीट मिळत नाही, समस्यांचे तात्काळ निराकरण केले जात अशी तक्रार समिती सदस्यांनी केली. सध्या बीएसएनएलकडे निधीची कमतरता असल्यामुळे काही सदस्यांनी केलेल्या काही सूचना आणि तक्रारी दूर करण्याबाबत व्यवस्थापनाने विवशता दर्शविली.
यावेळी सदस्यांनी मांडलेल्या सूचना आणि समस्यांवर बोलताना क्षेत्र महाप्रबंधक धानोरकर म्हणाले, सल्लागार समितीची बैठक वर्षातून दोन वेळा होणे अपेक्षित आहे.परंतु यावेळी ती अपरिहार्य कारणाने लांबणीवर गेली. बीएसएनएलकडे वापरात नसलेल्या काही मालमत्ता असून त्यावरही चर्चा झाली. उत्पन्न वाढविण्यासाठी या मालमत्ता भाड्याने देण्याचा निर्णय घेतला गेला आहे. लवकरच बीएसएनएल ४ जी सेवा सुरू करत आहे. त्याची चाचणी नुकतीच झाली आहे. डिसेंबर २०२४ मध्ये ही सेवा ग्राहकांना देण्यास सुरुवात होईल. ग्रामीण भागात ९३ टॉवर्स उभारण्याची मंजुरी केंद्र सरकारकडून मिळाली असून त्यामुळे ११० गावांना सेवा देणे उपलब्ध होईल. ग्रामपंचायतींच्या सहयोगातून अधिक चांगले काम करता येईल. भविष्यात बीएसएनएल ग्रामीण भागात मोठे नेटवर्क उभारण्याच्या तयारीत असून त्यामुळे तोटा कमी होईल एव्हढेच नव्हे तर खासगी कंपन्यांशी स्पर्धा करण्यास बीएसएनएल सक्षम होईल.
पुढील बैठक सहा महिन्यांनी होईल. तोपर्यंत सदस्यांनी केलेल्या सूचना आणि तक्रारींचे निवारण केले जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
Discussion about this post