व्हीएसआरएस मराठी न्युज पिंपरी –
पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून प्रस्तावित असलेल्या पुनावळे कचरा डेपो आरक्षण रद्द करावे आणि पर्यायी जागेत कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारावा. या मागणीसाठी परिसरातील सुमारे ७ हजार दुचाकीस्वाराची प्रचंड रॅली काढण्यात आली.
साेसायटीधारकांसह भूमिपुत्रांनी या रॅलीमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि प्रशासनाचा निषेध नोंदवला. एखाद्या प्रकल्पाविरोधात आजपर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्याप्रमाणात दुचाकी रॅली काढण्यात आली. त्यामुळे प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
राज्य शासनाच्या वनविभागाच्या जागेत आणि पुनावळे हद्दीत महापालिका प्रशासन कचरा डेपो उभारणार आहे. यामुळे पुनावळे, ताथवडे, मारुंजी, जांबे, हिंजवडी, लाइफ रिपब्लिक टाऊनशिप, वाकड या भागातील सोसायटीधाकर आणि रहिवाशांना मोठा फटका बसणार आहे. २००८ साली कचरा डेपोचे आरक्षण टाकण्यात आले. त्यानंतर या भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प आणि लोकवस्ती झाली आहे. कचरा डेपोमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होणार असून, जलाषयही दुषित होणार आहेत. तसेच, नागरी अरोग्याचाही प्रश्न निर्माण होणार आहे.
या विरोधात रविवारी दुचाकी रॅली आणि चिपको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला आहे. प्रस्तावित वृक्षतोडी विरोधात झाडांना आलिंगन देऊन प्रशासनाचा निषेध करण्यात आला. पिंपरी-चिंचवड सहकारी गृहनिर्माण संस्था फेडरेशन आणि पुनावळे रेसिडेंट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुनावळे येथे वनविभागाची २६ हेक्टर जागा आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने मागणी केल्यामुळे ही जागा महापालिकेकडे हस्तांतरित केली आहे.
शहराचा विकास करणे ही प्रशासनाची जबाबदारी असते पण सत्ताधाऱ्यांच्या संगनमताने पुनावळेत कचरा डेपो उभा करून नक्की कोणाचे हीत जोपासले जातेय? असा प्रश्न राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केला.
तसेच, सोसायटीधारक आणि भूमिपुत्रांनी काढलेल्या दुचाकी रॅलीत सहभागी होत प्रस्तावित कचरा डेपोविरोधी आंदोलना पाठिंबा दिला.
शहराध्यक्ष तुषार कामठे म्हणाले की, एकीकडे पिंपरी चिंचवड शहराला अर्बन इनोव्हेशन प्रकारात जगातील १५ शहरांमध्ये जागतिक नामांकन मिळाले आहे ही निश्चित अभिमानाची बाब आहे. लोकनेते पवार साहेबांनी आपल्या विकासाच्या दूरदृष्टीतून संत तुकाराम महाराज साखर कारखान्याची जागा स्थलांतरित करुन जागतिक दर्जाचे हिंजवडी आयटी पार्क उभे केले. आज या आयटी पार्क मधून देशभरात लाखो रोजगार निर्माण झाले आणि मोठ्या प्रमाणात सरकारला महसूल देखील मिळत आहे असे असतांना दुर्दैवाने हिंजवडी आयटी पार्क जवळील पूनावळे येथे कचरा डेपोच्या माध्यमातून महानगरपालिका या परिसराचे असलेले औद्योगिक महत्त्व आणि पूनावळे सह मारुंजी, ताथवडे,वाकड, हिंजवडी आदि भागातील लाखो नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा घाट घालत आहे.
Discussion about this post