व्हीएसआरएस मराठी न्युज -पिंपरी पावसामुळे वीजप्रवाह खंडीत होत असल्याने दुरूस्तीच्या कामासाठी महावितरणकडून पुणे परिमंडलातील सुमारे ४ हजार २७५ कर्मचाऱ्यांची नेमणुक करण्यात आली आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्यास तातडीने दुरूस्त करावा, वेळ लागणार असेल तर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशा सूचना पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता सचिन तालेवार यांनी शाखा अभियंत्यांना दिले.
पुणे व पिंपरी चिंचवड शहरामध्ये भूमिगत वीजवाहिन्यांचे प्रमाण अधिक आहे. गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये विविध संस्थांकडून झालेल्या खोदकामात काही उच्च व लघुदाब भूमिगत वीजवाहिन्यांना तोडण्याचे परिणाम आता पावसाळ्यात दिसून येत आहे. काही ठिकाणच्या भूमिगत वीजवाहिन्या रस्ता रुंदीकरणात किंवा क्रॉन्क्रिटीकरणामध्ये रस्त्याखाली गेल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची उंची वाढवल्यामुळे कडेला असलेले फिडर पीलर, रिंगमेन युनिटमध्ये पाणी शिरत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. पावसाचे पाणी साचल्यामुळे भूमिगत वीजवाहिन्यांमध्ये आर्द्रता निर्माण होऊन वीजपुरवठा खंडित होत आहे.
यासोबतच वीज यंत्रणेवर किंवा सर्व्हीस वायरवर झाडे कोसळणे, मोठ्या फांद्या तुटून पडणे, आदींमुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. तर शहर व ग्रामीणमधील काही खोलगट व सखल भागात पावसाचे पाणी साचल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने रोहित्रांचा वीजपुरवठा बंद करून ठेवण्यात येत आहे.वीजपुरवठा खंडित झाल्याची तक्रार येताच प्राथमिक चाचणी घेतली जाते. त्यामधून वीज सुरळीत झाली नाही तर पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा सुरु केला जातो.
मात्र पर्यायी व्यवस्था नसल्यास दोष आढलेल्या ठिकाणी खोदकाम करणे, केबलमधील आर्द्रता काढणे, जॉईंट देणे आदी कामे करावी करण्यात येत आहे. काही ठिकाणी पाणी साचल्यामुळे पाण्याचा उपसा करून ही कामे करावी लागत आहेत, असेही त्यांनी सांगितले.
Discussion about this post