व्हीएसआरएस मराठी न्युज –बुलढाणा: दि- १० मार्च (गुरुवार) बुलढाणा शहरातील गर्दै सभागृहात बुधवारी सायंकाळी पद्मश्री पुरस्कारप्राप्त डॉ. हिंमतराव बावस्कर यांचा सपत्नीक नागरी सत्कार सोहळा पार पडला. यावेळी सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. रशिया युक्रेन युध्दाच्या पाश्वभूमीवर बाेलताना ते म्हणाले की बुध्दांच्या या देशाने पुन्हा एकदा देशाला शांतीचा संदेश द्यावा..
यावेळी अध्यक्षस्थानी गुरुकुंज आश्रम मोझरीचे अध्यक्ष आचार्य हरिभाऊ वेरुळकर गुरुजी, पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे, डॉ. स्मिता कोल्हे, हर्षवर्धनदादा सपकाळ, जिल्हाधिकारी डॉ. एस. राममूर्ती उपस्थित होते. मातृभूमी फाउंडेशनने या सोहळ्याचे आयोजन केले होते.
शहरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्याच्या मागणीचा काल पद्मश्री डॉ. हिंमतराव बावस्कर यांनी पुनरूच्चार केला. राजकारण्यांच्या उदासिनतेला टोला हाणत त्यांनी राजकीय हिस्सा असल्याशिवाय महाविद्यालय होणार नाही… जोपर्यंत वैद्यकीय महाविद्यालय होत नाही तोपर्यंत चूप बसू नका. सर्वांनी तयारी केली तर वैद्यकीय महाविद्यालय झाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगून त्यांनी या जुन्याचा प्रश्नाला पुन्हा संघर्षाचे रुप देत एकप्रकारे आंदोलनाची ठिणगीच टाकली.
डॉ. बावस्कर पुढे म्हणाले, की ज्या बुलडाणा शहरात शिक्षण मिळवण्यासाठी वनवास भोगला त्याच बुलडाण्यात नागरी सत्कार होतोय हे माझे भाग्य आहे. बुलडाणा शहरात माझी अग्नीपरीक्षा झाली आणि ती उत्तीर्ण झालो, असे ते म्हणाले. बुलडाण्यात शिक्षण घेतानाच्या आठवणी सांगताना ते म्हणाले, की चिमणीच्या दिव्याखाली अभ्यास केला. २ तास झाले की आई रॉकेल महाग झाल्याची आठवण करून देत होती. मोठा भाऊ शिकत असल्याने मी शिकू नये असे वडिलांना वाटत होते. मात्र आई माझ्या पाठीशी होती. मी सरस्वतीची पूजा केली. लक्ष्मीची पूजा केली नाही म्हणून पद्मश्री भेटला, असे ते म्हणाले. पुरस्कार उशिरा भेटला हे चांगलं झालं. कारण पुरस्कार मिळाल्यापासून सत्कार सुरू आहेत. मला अभ्यासापासून दूर जाणं आवडत नाही आणि परवडतसुद्धा नाही, असे ते म्हणाले.
आईचे योगदान महत्त्वाचे…
माझी आई अशिक्षित होती. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी झालो तेव्हा या खुर्चीवर बसून लोकांकडून पैसे घेऊ नको असे आईने सांगितले. रायगड जिल्ह्यात काम करताना विचंवाने रुग्ण दगावत असल्याचे कळले आणि त्यावर संशोधन करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी फक्त ८२३ रुपये पगार मिळत होता. संशोधन करणाऱ्यांना बक्षीस मिळते असे आईला वाटत होते. त्यामुळे आई मला तुला बक्षीस मिळत नाही का?, असे विचारायची. तेव्हा विंचू खेड्यातला लोकांना चावतो आणि पुरस्कार शहरातील लोक देतात, असे मी उत्तर द्यायचो. आज आई असती तर आज सरकारला विंचू चावला असे ती म्हणाली असती, असे डॉ. बावस्कर म्हणाले. जेव्हा माझे काम संपेल तेव्हा मी या जगात नसेल.
Discussion about this post