व्हीएसआरएस मराठी न्युज -विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्यासंदर्भातील पत्रही दिले होते. याच पत्राचा आधार घेऊन काँग्रेसने आता राज्यपालांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणात लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा झाल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
बाळासाहेब थोरात पुढे म्हणाले, ‘विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी आमचे शिष्टमंडळ तीनवेळा राज्यपालांना भेटले होते. अध्यक्षांची निवड करू द्या, अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नाकारली होती. आता मात्र ही निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे याबद्दल शंका उपस्थित होते. या निवडीसंदर्भात आम्ही जो कायद्यात बदल केला होता, तो वैध ठरला का? की जुन्याच पद्धतीने ही निवड केली जाणार आहे, याचे उत्तर अपेक्षित आहे.’
Discussion about this post