व्हीएसआरएस मराठी न्युज –देऊळवाडा व संत तुकोबारायांचे घर या दोन्हींच्यामध्ये इनामदार वाडा आहे. आषाढी वारीसाठी तुकोबारायांची पालखी मार्गस्थ झाल्यानंतर पहिला मुक्काम या वाड्यात असतो.
म्हणून या वाड्याला महत्त्व आहे. संस्थान हे पूर्वी इनामदारांच्या ताब्यात होते. हे मोरे वशंजातीलच मात्र त्यांना तुकाराम महाराज यांच्याकडून इनामदार ही पदवी बहाल केल्यामुळे इनामदार हे नाव पडले.
त्यांना किन्हई, येलवडी व सांगुर्डी ही गावे इनाम म्हणून दिली होती. परंपरेनुसार आजतागायत नारायण महाराज यांनी पालखी सोहळा सुरु केला तेव्हापासून पालखीने प्रस्थान ठेवल्यानंतर पहिला मुक्काम हा इनामदार वाड्यात असतो. पालखीचा मुक्काम असताना पहिल्यांदा समाजआरती होते. रात्री कीर्तन, जागर व पहाटे काकड आरती होते. त्यानंतर संस्थान पूजा आणि पाठोपाठ शासकीय पूजा झाल्यानंतर पालखी पुढे मार्गस्थ होते.
पालखीचा पहिला मुक्काम देहूगाव येथील इनामदार वाड्यात होणार आहे. त्यानंतर 11 जून रोजी तुकोबांची पालखी देहूगाव येथून आकुर्डीकडे प्रस्थान करणार आहे. या पालखीचा 11 जून रोजीचा मुक्काम आकुर्डी येथील विठ्ठल मंदिरात नियोजित आहे. तसेच, याच दिवशी संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथून प्रस्थान होणार आहे. या पालखीचा 11 जून रोजीचा मुक्काम गांधीवाडा आळंदी येथे असणार आहे. त्यानंतर 12 जून रोजी दोन्ही पालख्या पुणे शहराकडे प्रस्थान करणार आहेत.
दरम्यान, या पालखी सोहळ्यावर तीन अत्याधुनिक सर्व्हेलन्स व्हेईकल करडी नजर ठेवणार आहेत. पालखी एकूण मार्गावर 345 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. चार ड्रोन कॅमेरे निगराणी करणार आहेत. काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बॉम्बशोधक, नाशक पथकाच्या चार टीम राहणार आहेत. महिला वारकरी आणि पालखीच्या दर्शनासाठी जाणार्या महिलांच्या छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी दोन विशेष पथके तयार केली आहेत.
तसेच, सोनसाखळी चोरीच्या घटना रोखण्यासाठी तब्बल 12 पथके तयार केली आहेत. नागरिकांसाठी 39 ठिकाणी सूचना फलक लावले आहेत. महत्त्वाच्या चार ठिकाणी पोलिस मदत केंद्र तर चार ठिकाणी महिलांच्या संरक्षणासाठी दामिनी पथके गस्त घालणार आहे.
आकुर्डीतील मुक्कामाचे ठिकाण आणि पालखी मार्गावर पिण्याचे पाणी, शौचालय, प्रकाश व्यवस्था तसेच साफसफाईची सुविधा तैनात केली आहे.
संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे रविवारी (दि. 11) सायंकाळी निगडी येथे पिंपरी-चिंचवड शहरात प्रवेश होणार आहे. त्या दिवशी आकुर्डी येथील विठ्ठल मंदिर येथे पालखीचा मुक्काम आहे. दुसर्या दिवशी सोमवारी (दि.12) सकाळी पालखी पुण्याच्या दिशेने मार्गस्थ होणार आहे. त्या दिवशी आळंदी रस्ता येथे संत ज्ञानेश्वर महाराज पालखी शहरातून जाणार आहे.
Discussion about this post