मुंबई | (व्हीएसआरएस न्यूज) | महाराष्ट्र शासनाच्या वतीने ८ फेब्रुवारीरोजी आयोजित करण्यात येणारा ‘ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार’ सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने पत्रकातून दिली आहे. वर्ष १९-२०, २०-२१, २१-२२ व २२-२३ या वर्षांचा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार विविध मान्यवरांना प्रदान करण्यात येणार होता. हा कार्यक्रम आळंदी येथे आयोजित केला होता.
पुरस्कार प्राप्त बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीचे निधन झाल्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकणार नाहीत. तर श्री बद्रीनाथ तनपुरे महाराज प्रकृती अस्वस्थपणामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचे त्यांनी कळवले आहे. या अपरिहार्य कारणामुळे सांस्कृतिक कार्य संचालनालयाने हा कार्यक्रम पुढे ढकलला असल्याचे पत्रकात म्हटले आहे. पुरस्कार सोहळ्याची तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही यात म्हटले आहे. दरम्यान, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बाबा महाराज सातारकर यांच्या पत्नीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
Discussion about this post