Pune News : पुणे : पंतप्रधान मोदी यांनी २९ एप्रिल रोजी पुण्यातील जाहीर सभेतून नागरिकांना संबोधित करताना ‘स्वप्न अपूर्ण राहिलेला आत्मा’ असा शरद पवार यांचा नाव न घेता उल्लेख करत त्यांच्यावर शरसंधान केले. ‘स्वप्न अपूर्ण राहिलेला आत्मा भटकत राहतो. महाराष्ट्र अशाच भटक्या आत्म्याचा शिकार झालेले राज्य आहे. ४५ वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याने आपल्या स्वार्थासाठी हा खेळ सुरू केला. तेव्हापासून महाराष्ट्र अस्थिर झाला आहे. आता हा आत्मा केवळ विरोधकांनाच नव्हे तर स्वतःच्या कुटुंबालाही सोडत नाही. अशी कठोर टीका मोदी यांनी पवार यांचे नाव न घेता केली.
पुण्यातील रेसकोर्स येथे पुणे, बारामती, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांसाठी मोदी यांची जाहीर प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, मनसे नेते अमित ठाकरे, सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, शिवाजीराव आढळराव, श्रीरंग बारणे, रूपाली चाकणकर, खा. मेधा कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रकाश जावडेकर यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी उपस्थित होते.
युती सरकार राज्याला विकासाच्या मार्गावर घेऊन जाईल असे सांगत मोदी यांनी हे सरकार राज्याच्या विकासातील मागील २५ वर्षांच्या उणिवा भरून काढेल असे म्ह्टले.
आपल्या भाषणात पाकिस्तानलाही त्यांनी सज्जड इशारा दिला. दहशतवादी पाठविणार्यांना आता पीठही मिळेनासे झाले आहे. पीएफआयवर घातलेल्या बंदीचा उल्लेख आपल्या भाषणात करत मोदी म्हणाले त्यांचे तिस्मारखाँ तुरुंगात आहेत.आता त्यांनी त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास घरात घुसून मारू
यावेळी त्यांनी काँग्रेसवरही टीका केली. काँग्रेसने भगव्याला दहशतवादी ठरवले. देशाची दिशाभूल केली. आता ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्यांकांना देण्याचा घाट घालत आहेत. आम्ही धर्माच्या नावाव्र आरक्षण कदापि देऊ देणार नाही.
Discussion about this post