Maharashtra : पिंपरी : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्यात शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरून सवालजबाब रंगले असून यामुळे परिसरातील नागरिकांचे मनोरंजन होत आहे.
पुण्यात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका केली. त्याचबरोबर शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच असे ठाम प्रतिपादन त्यांनी केले आहे. पवार म्हणाले;एका खासदाराने मतदारसंघात पाच वर्षे लक्ष दिले असते, तर खूप चांगले झाले असते. त्या खासदाराला उमेदवारी देण्याचे काम मी केले. तसेच, निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे-पाटील यांनी जिवाचे रान केले आहे. मधील काळात मतदारसंघात ते फिरत नव्हते. राजीनामा देण्याची तयारी केली होती. मी एक कलावंत आहे, माझ्या चित्रपटांवर परिणाम होतोय. छत्रपती शिवाजी महाराजांवर काढलेला चित्रपट चालला नाही. याचा आर्थिक गोष्टीवर परिणाम होतोय, असे वरिष्ठांना आणि मला सांगत होते. पण, आता निवडणुका आल्याने यांना उत्साह आला आहे. त्यामुळे कुणाला संघर्ष तर कुणाला पदयात्रा सुचत आहे.मात्र, आता शिरूरमध्ये दिलेला उमेदवार निवडून आणणारच.
यानंतर खासदार कोल्हेंनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, अजित पवार हे मोठे नेते आहेत. माझ्यासारख्या लहान कार्यकर्त्याला ते आव्हान देतील, असे वाटत नाही. कारण, शिरूर मतदारसंघातील कामांचे त्यांनीच कौतुक केले आहे.कांद्याच्या निर्यातीबाबत शेतकऱ्यांमध्ये आक्रोश आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न पदयात्रेतून मांडणार आहोत. कांद्याची निर्यातबंदी उठवण्यासाठी अजित पवारांनी पदयात्रेला पाठिंबा दिला पाहिजे. मी १०० टक्के निवडणूक लढवणार आहे. याचा निर्णय शरद पवार घेतील. निवडणूक एकमेकांना आव्हान देण्याची गोष्ट नाही तर प्रतिनिधित्व आणि प्रश्न मांडण्याची गोष्ट आहे.
भविष्यात लोकसभा निवडणूक होईल. मतदार त्यांना योग्य वाटेल त्या उमेदवाराला निवडून देतील. पण, सध्या मात्र, या नेत्यांमधील सुरू असलेल्या शाब्दिक कुरघोडीमुळे नागरिकांची करमणूक होत आहे.
Discussion about this post