व्हीएसआरएस न्युज चेन्नई – ब्रिस्बेन कसोटीतील नवोदितांनी केलेल्या अफलातून खेळाची पावती म्हणून आजपासून येथे सुरू होत असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारतीय संघात याच नवोदितांना पुन्हा एकदा आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी मिळणार आहे.
तसेच केवळ नवोदितच नव्हे तर दुखापतीतून पूर्ण तंदुरुस्त ठरलेल्या अनुभवी खेळाडूंसह संघाचा योग्य समतोल राखण्याकडे भारतीय संघव्यवस्थापनाचा कल राहणार आहे.
चेपॉकची ही खेळपट्टी क्रिकेटशी संबंध नसलेल्या व्यक्तीने जरी केली असली तरीही त्याकडे तमिळनाडू क्रिकेट संघटनेच्या तांत्रीक समितीने लक्ष दिल्याचे वृत्त आहे.
त्यामुळे परंपरेनूसार ही खेळपट्टी पहिले दोन दिवस वेगवान गोलंदाजांना तर नंतरचे तिनही दिवस फिरकी गोलंदाजांनाच मदत करेल अशी शक्यता बळावली आहे. भारतीय संघ ही चार कसोटी सामन्यांची मालिका मायदेशात खेळत असल्यामुळे नेहमीप्रमाणे त्यांचेच पारडे जड राहणार असे सांगितले जात आसले तरीही इंग्लंडची वेगवान गोलंदाजी खेळणे त्यांच्यासाठीही आव्हान राहणार आहे.