व्हीएसआरएस न्युज
Vijay Diwas: भारताने पाकिस्तानला झुकवून जगाचा नकाशा बदलला होता…
नवी दिल्ली- 16 डिसेंबर 1971 च्या युद्धात भारताने पाकिस्तानचा केलेला पराभव ‘विजय दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या युद्धाच्या शेवटी 93,000 पाकिस्तानी सैनिकांनी आत्मसमर्पन केले होते. 1971 मध्ये भारताने पाकिस्तानच्या केलेल्या पराभवामुळे पूर्व पाकिस्तान स्वतंत्र झाला, जो आज बांगलादेश म्हणून ओळखला जातो. हे युद्ध भारतासाठी ऐतिहासिक ठरले. त्यामुळेच 16 डिसेंबर विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या युद्धात 3,900 भारतीय सैनिक शहीद झाले होते.
पूर्व पाकिस्तानमधील कमांडर लेफ्टिनेंट जनरल एएके नियाजी यांनी भारताचे पूर्व सैन्य कमांडर लेफ्टिनेंट जनरल जगजीत सिंह अरोडा यांच्यासमोर आत्मसमर्पन केले होते, ज्यात 17 डिसेंबरला 93,000 पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी बनवण्यात आलं होतं.
युद्धाची पृष्ठभूमि 1971 पासून बनू लागली होती. पाकिस्तानचे लष्कर हुकुमशहा याहिया खां यांनी 25 मार्च 1971 ला माजी पाकिस्तानच्या लोक भावनांना लष्करी ताकदीच्या जोरावर चिरडण्याचा आदेश दिला. पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानच्या वर्चस्वामुळे नाराज होता. पूर्व पाकिस्तानच्या लोकांवर अनेक बंधने लादण्यात आली होती. तसेच येथील अनेक नेते तुरुंगात किंवा त्यांना कायमचं संपवण्यात आलं होते. अशावेळी पूर्व पाकिस्तानमध्ये सरकारविरोधात प्रचंड असंतोष होता. नागरिकांचे आंदोलन पाकिस्तान सरकार बळाच्या सहाय्याने दडपत होते. याच पार्श्वभूमीवर अनेक शरणार्थी भारतात येऊ लागले. अशा परिस्थितीत हस्तक्षेप करण्यासाठी भारतावर दबाव येऊ लागला. तत्कालीन प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी लष्कर प्रमुख जनरल मानेकशॉ यांचा सल्ला घेतला.
3 डिसेंबर, 1971 ला पाकिस्तानी वायुसेनेच्या विमानांनी भारतीय सीमा ओलांडत पठाणकोट, श्रीनगर, अमृतसर, जोधपूर, आग्रा येथील हवाई अड्ड्यांवर बॉम्ब वर्षाव सुरु केला. त्यावेळी इंदिरा गांधींनी तातडीची मंत्रीमंडळ बैठक घेतली. युद्ध सुरु झाल्यानंतर भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये सैन्य घुसवत खूलना आणि चटगांववर ताबा मिळवला. 14 डिसेंबर रोजी भारतीय सैन्याने एक गुप्त संदेश पकडला. ज्यानुसार दुपारी अकरा वाजता ढाका गव्हर्नमेंट हाऊसमध्ये एक महत्वाची बैठक होणार होती, ज्यात पाकिस्तानचे अनेक मोठे नेते भाग घेणार होते. भारताने त्यावेळी या हाऊसवर बॉम्ब टाकला. यामुळे तेथील सैन्य अधिकारी पुरते घाबरुन गेले.
भारताने पूर्व पाकिस्तानमध्ये चांगलीच आघाडी घेतली होती. अरोडा आपल्या सैनिकांसोबत दोन तासात ढाका येथे पोहोचणार होते. पाकिस्तानचे कमांडर नियाजी यांच्याकडे आत्मसमर्पन करण्यावाचून अन्य कोणताही पर्याय नव्हता. अरोडा आणि नियाजी यांनी एकत्र बैठक घेतली. त्यानंतर नियाजी यांनी आत्मसमर्पनाचे कागदपत्र अरोडा यांच्याकडे सूपूर्द केले. भारताने पाकिस्तानवर विजय मिळवला होता. पाकिस्तान आणि बांगलादेश असे दोन देश निर्माण झाले होते. भारतीय सैन्याने जगाचा नकाशा बदलल एका नव्या देशाला जन्म दिला होता.