व्हीएसआरएस न्युज भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आज (०६ मार्च) तिसऱ्याच दिवशी भारताने एक डाव आणि २५ धावांनी विजय मिळवला .
भारताने इंग्लंडविरुद्धची कसोटी मालिका ३-१ अशा फरकाने जिंकली.
याबरोबरच भारताचे जूनमध्ये होणाऱ्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. अंतिम सामन्यात भारताचा सामना न्यूझीलंड विरुद्ध होईल. तसेच हा भारताचा मायदेशातील सलग १३ वा कसोटी मालिका विजय आहे.
चौथ्या सामन्यात भारताचा पहिला डाव ३६५ धावांवर संपुष्टात आल्याने भारताने १६० धावांची आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या डावात इंग्लंडला ५४.५ षटकात सर्वबाद १३५ धावाच करता आल्या.
इंग्लंडकडून डॅनिएल लॉरेन्सने एकाकी झुंज दिली. त्याने सर्वाधिक ५० धावा केल्या. त्याच्या व्यतिरिक्त जो रुटने ३० धावांची खेळी केली. बाकी कोणाला फारसे काही करता आले नाही.
भारताकडून अक्षर पटेल आणि आर अश्विनने प्रत्येकी ५ विकेट घेतल्या.