व्हीएसआरएस न्युज –पिंपरी पिंपरी चिंचवड शहरातील पावणे दोन लाख अनधिकृत बांधकामे नियमीत करण्याचे आश्वासन देत महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तेला सुरूंग लावणाऱ्या भाजपला गेल्या चार-पाच वर्षांत हा प्रश्न सोडविता आलेला नाही.
भाजपने आपली घोऱ फसवणूक केल्याची भावना तीव्र झाली आहे. सव्वा वर्षावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकित त्याचा गंभीर परिणाम महापालिकेतील सत्ताधारी भाजपला भोगावा लागेल असे आताचे चित्र आहे.
राज्यातील भाजपचे सरकार गेले आणि वर्षापूर्वी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस महाआघाडीचे सरकार सत्तेत आले. निवडणूक प्रचारात स्वतः अजित पवार यांनीही किरकोळ दंड आकारून सर्व अनधिकृत बांधकामे नियमीत करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. महाआघाडी मध्ये ते उपमुख्यमंत्री झाले. अद्याप त्यांनीही या विषयावर कुठलेही भाष्य केलेले नाही. आता आगामी महापालिका निवडणुकित पुन्हा हाच विषय पेटणार आहे. प्रचाराचा तो प्रमुख मुद्दा करायचा आणि भाजपला धोबीपछाड करायची राष्ट्रवादी काँग्रेसची व्युहरचना आहे. भाजपने सात वर्षांत काहीच केले नाही म्हणून सामान्य मतदार आता राष्ट्रवादी आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आशेने पाहतो आहे. सत्तेवर येण्यासाठी आता अजित पवार हेच कार्ड खेळणार आणि भाजपला सत्ताच्युत करणार का याकडे लक्ष लागून राहिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पुढची दिशा ठरणार आहे, मात्र भाजपचा पाडाव करण्यासाठी हा मुद्दा प्रभावी ठरणार आहे, असे दिसते