औरंगाबाद । व्हीएसआरएस न्यूज ।
गेल्या आठवड्याभरापासून औरंगाबादच्या बाजारसावंगी येथील गावकऱ्यांच्या झोपचे खोबरे झालं आहे. त्यामुळे रात्रीऐवजी गावकऱ्यांवर दिवसा झोपण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे याचं कारण ऐकून तुम्हीही डोक्याला हात मारून घ्याल. झालं असं की, बाजारसावंगी गाव तसं मोठं असल्याने आजूबाजूला असलेल्या गावाची आर्थिक देवाणघेवाण आणि बाजाराचे मुख्य ठिकाण म्हणून बाजारसावंगीची ओळख आहे. त्यामुळे गावात जिल्हा मध्यवर्ती सहकारी आणि बँक ऑफ महाराष्ट्रसह इतर चार पतसंस्था आहेत. पण गेल्या काही दिवसांपासून बँक ऑफ महाराष्ट्र बँकेचं सायरन रोज रात्री दोन-तीन वेळा वाजतोय. त्यामुळे गावकऱ्यांची झोप उडाली असून, ‘लांडगा आला रे आला’ अशी परिस्थिती झाली आहे.
रात्री सायरन वाजलं की, काही तरी झालं म्हणून गावकरी झोपेतून उठून पळापळ करतात मात्र बँकेच्या तांत्रिक कारणामुळे सायरन वाजत असल्याचं कळतं. बँकेच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करून सायरन बंद केलं जातं पण काही तासांनी पुन्हा सायरन सुरू होते. गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या सायरनच्या रात्रीच्या खेळामुळे मात्र गावकऱ्यांच्या झोपेचं खोबरे झालं आहे. तर काहींवर दिवसा झोपण्याची वेळ आली आहे.
शाखाअधिकारी म्हणतात…
या सगळ्या गोंधळावर माध्यमांशी बोलताना बँकेचे शाखाधिकारी यांनी मात्र हटकेच दावा केला आहे. उंदरामुळे हा सायरन वाजला गेला असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्यामुळे रोज वाजणाऱ्या सायरनकडे गावकऱ्यांनी आता लक्ष देणे बंद केलं आहे, पण एखांद्या दिवशी खराखुरा सायरन वाजला तरी ‘लांडगा आला रे आला’ असं होऊ नये म्हणजे झालं, अशी भावना गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
Discussion about this post