व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 14 एप्रिल रोजी असलेली जयंती यंदा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरी करावी लागणार आहे.
भीम जयंतीच्या मिरवणुका, गाण्याचे कार्यक्रम, पथनाटय़े, बाईक रॅली काढण्यास मनाई करण्यात आली असून घरुनच बाबासाहेबांना अभिवादन करा, असे राज्य सरकारने सुचवले आहे.
13 एप्रिलच्या रात्री भिमानुयायी गाण्यांचे जाहीर कार्यक्रम आयोजित करत असतात. यंदा तसे कार्यक्रम घेता येणार नाहीत. 14 एप्रिल रोजी सकाळी 7 ते रात्री 8 या कालावधीत जयंती उत्सव करता येईल. तसेच बाबासाहेबांच्या प्रतिमेला, पुतळ्याला पुष्पहार अर्पण करताना 5 पेक्षा अधिक व्यक्ती असता कामा नये, असे बंधन घालण्यात आले आहे.
मुंबईतील चैत्य भूमी आणि नागपूर येथील दिक्षा भूमी येथे 14 एप्रिल रोजी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मोठी गर्दी होत असते. मात्र यंदा या दोन्ही स्थळी अवघ्या 50 व्यक्तींना उपस्थित राहण्याचा नियम करण्यात आला आहे. जयंती सोहळ्याचे दूरदर्शनवर थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
राज्याच्या गृह विभागाने शुक्रवारी यासंदर्भात परिपत्रक जारी केले असून भीम जयंती निमित्ताने यंदा कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम घेता येणार नाहीत, मात्र आरोग्यविषयक उपक्रम घेता येतील, असे सूचवले आहे.
14 एप्रिल रोजी मिरवणूक, गाण्याच्या कार्यक्रमांना बंदी.
चैत्यभूमी व दीक्षाभूमी येथे 50 व्यक्तींना उपस्थितीस मुभा.