व्हीएसआरएस न्युज –मुंबई प्रतिनिधी-
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वाढीव वीज बिलासंदर्भात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेतली आहे. राज ठाकरे यांनी राज्यपालांची भेट घेऊन निवेदन दिलं. राज ठाकरेंनी राज्यपालांशी वाढीव वीजबिलासंदर्भात चर्चा केली. आणि त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
या भेटीदरम्यान राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी या विषयावर बोलण्याचा सल्लाही दिला आहे. त्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले की, मी शरद पवार यांच्याशी बोलेन. फोनवरुन बोलेन किंवा प्रत्यक्ष भेटून बोलेन. वेळ पडल्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेईन.
लॉकडाऊनच्या काळात लोकांना भरमसाठ वीज बिल देण्यात आले आहे.
याबद्दल आम्ही राज्य सरकारशी बोललो. पण, त्यावर अजूनही कोणताही तोडगा निघाला नाही. म्हणून राज्यपालांशी बोलण्यासाठी आलो, असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.
वीज ग्राहकांना दिलेला वाढीव वीज बिलांचा शॉक आणि दुधाला न्याय्य भाव मिळावा ह्या शेतकऱ्यांच्या वाजवी मागणीकडे केलेलं दुर्लक्ष ह्यामुळे जनक्षोभ उसळला आहे तरीही सरकार शांत आहे तेंव्हा आता राज्यपाल महोदयांनीच ह्या विषयात सरकारला निर्देश द्यावेत अशी
विनंती पक्षातर्फे करण्यात आली.
वीज बिलांचा विषय मनसेनं लावून धरला आहे. अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आलं. अदानी, बेस्टची लोकं भेटली. आम्ही बिल कमी करु शकतो मात्र एनईआरसी कमी करावा लागेल. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी बोलणं झालं. लवकरात लवकर निर्णय घेऊ असं ते सांगतात. मात्र अद्याप निर्णय झालेला नाही. याविषयी राज्य सरकारलाही माहिती आहे. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर निर्णय घ्यावा. त्याच संदर्भात पहिलं निवदेन राज्यपालांना भेटून दिलं असल्याचं, राज ठाकरे म्हणालेत.