व्हीएसआरएस न्युज कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर भाविकांना दर्शनासाठी अद्यापही बंदच आहे. मात्र, परंपरेप्रमाणे होणारा किरणोत्सवाचा सोहळा आज (ता. ८) पासून होणार असून, सलग पाच दिवस किरणांचा अभ्यास केला जाणार आहे.
दरम्यान, देवस्थान समिती व विवेकानंद कॉलेजचे प्रा. मिलिंद कारंजकर आणि टीमने कालपासूनच मावळतीच्या सूर्यकिरणांची पाहणी सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी मावळतीची सूर्यकिरणे देवीचा चरणस्पर्श करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पूर्वी तीन दिवसांचा असणारा हा सोहळा अलीकडच्या काळात पाच दिवसांचा असल्याचे स्पष्ट करून देवस्थान समितीने गेल्या वर्षीपासून पाच दिवसांचा सोहळा जाहीर केला. त्यानुसार आता सलग पाच दिवस हा सोहळा होईल. मात्र, मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद असल्याने कुणालाही प्रवेश दिला जाणार नाही.