व्हीएसआरएस न्युज मुंबई-प्रतिनिधी येत्या २३ नोव्हेंबरपासून राज्यातील शाळा खुल्या केल्या जाणार आहेत. शालेय शिक्षण विभागाकडून याबाबतची नियमावली बनवण्यात आली आहे. या नियमावलीनुसार राज्यातील आधी नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरु करण्यात येणार आहेत.
काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये आम्ही राज्य सरकारला शाळा सुरु करण्याबाबत विनंती केलेली आहे. दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे किमान 23 नोव्हेंबरपासून दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करावेत, जेणेकरून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा मे महिन्यात घेता येतील. जुलै महिन्यानंतर पावसाचं सावट असतं. यंदा दहावी बारावीचा 25 टक्के अभ्यासक्रम आम्ही कमी केलेला आहे. त्यामुळे 23 नोव्हेंबरला शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांकडून परवानगी आल्यानंतर याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिलेली आहे
वर्षा गायकवाड यांनी अकरावी प्रवेशाबाबतही माध्यमांना माहिती दिली. याबाबतचाही प्रस्ताव कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत मांडला गेला आहे. मंत्रिमंडळ बैठकीनंतर देखील अकरावी प्रवेशाबाबत चर्चा झाली. त्यांबाबत आज निर्णय घेतला जाऊ शकतो आणि पुढील दोन तीन दिवसात अकरावी प्रवेश सुरु केले जाऊ शकतात.
राज्यातील विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी. गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष तर सुरु झाले आहे, मात्र ऑनलाइनच्या माध्यमातून सर्व अभ्यास घेतला जात आहे. एकीकडे राज्य अनलॉक होत असताना कोरोना महामारीमुळे बंद ठेवलेल्या शाळा कधी सुरु करणार असा सवाल सातत्याने विचारला जात होता. त्यावर महाराष्ट्राच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.