गांधीनगर । व्हीएसआरएस न्यूज
ड्रग्ज प्रकरणावरून महाराष्ट्रात राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असताना व खुद्द नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) ही संस्था संशयाच्या भोवऱ्यात अडकली असताना गुजरातमधील द्वारका इथं सुमारे ३५० कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त करण्यात आलं आहे. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज पकडलं जाण्याची ही दुसरी वेळ आहे. त्यावरून राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजप व केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मुंबई शहर ड्रग्जचं हब झालं आहे असा दावा केला जातो. इथं काही ग्रॅम ड्रग्ज सापडलं तरी बॉलिवूडमधील कलाकारांची परेड केली जाते. आता गुजरातमध्ये ३०० ते ३५० कोटींचं ड्रग्ज सापडलंय. हे ड्रग्ज समुद्री मार्गानं आणलं जातंय का, याची चौकशी व्हायला हवी. कोणत्या पक्षाचा कुठल्या नेत्याचा यात संबंध आहे याचा मुलाहिजा न बाळगता एनसीबी व एनआयएनं ही चौकशी करावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे. ‘ड्रग्जचा खेळ गुजरातमधून चालवला जातो का? या प्रश्नाचं देखील उत्तर मिळायला हवं. मनीष भानुशाली, धवल भानुशाली सुनील पाटील हे गुजरातच्या नोव्हेंटॅल हॉटेलमध्ये राहत होते. त्यांचे गुजरात सरकारमधील मंत्री किरीटसिंह राणा यांच्याशी संबंध आहेत. हे लोक गुजरातमधून ड्रग्ज रॅकेट चालवत असावेत, असा संशय देखील मलिक यांनी व्यक्त केला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्वीट करून नवाब मलिक यांना अप्रत्यक्षपणे डुकराची उपमा दिली होती. त्यावरही मलिक यांनी प्रतिक्रिया दिली. ‘भाजपचे नेते त्यांच्या विरोधकांना कुत्रा, मांजर, साप, विंचू, डुक्कर अशा उपमा देतात. मलाही फडणवीस यांनी प्राण्याची उपमा दिलीय. भाजपचे लोक माणसाला माणूसही समजत नाहीत. त्यांच्या अशा उपमांमुळं आम्हाला कुठलाही कमीपणा येणार नाही किंवा आमची उंची कमी होणार नाही. पण यातून त्यांची मानसिकता व संस्कृती काय आहे हे दिसतं,’ असा टोला मलिक यांनी फडणवीस व भाजपला हाणला.
Discussion about this post