लखनऊ । व्हीएसआरएस न्यूज ।
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ६० जागांवर लढत असून लखनऊ येथे शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. शिवसेनेला उत्तर प्रदेशात काही छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळाला असून त्याची माहिती देतानाच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत राऊत यांनी यावेळी खूप मोठी घोषणा केली.
देशातील पाच राज्यांच्या निवडणुका असल्या तरी सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेशकडे लागले आहे. उत्तर प्रदेश हे देशातील सर्वात मोठे राज्य असून येथील निकाल नेहमीच देशाची दिशा आणि दशा ठरवतात. त्यामुळे ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची असून उत्तर प्रदेशचा निकाल २०२४ मध्ये होणाऱ्या परिवर्तनाच्या दिशेने पडणारे पहिले पाऊल असणार आहे, असे सूचक विधान संजय राऊत यांनी केले. उत्तर प्रदेश जौ कोल देणार आहे त्यातून २०२४ मध्ये काय होणार याचा अंदाज येईल, असेही राऊत पुढे म्हणाले.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत शिवसेना ५० ते ६० जागा लढत आहे. किसान रक्षा पार्टी, अवध केसरी सेना अशा पक्षांसोबत आम्ही युती केली आहे. काही शेतकरी संघटनाही आमच्या सोबत आहेत. नियोजनबद्धपणे आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत. आमचे पुढचे लक्ष्य लोकसभा निवडणूक आहे. विधानसभा निवडणुका झाल्या की लगेच आम्ही लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू करणार आहोत. महाराष्ट्राबाहेर लोकसभेच्या किमान १०० जागा लढवण्याचा निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. त्यात १५ ते २० जागा आम्ही उत्तर प्रदेशात लढणार आहोत, असे राऊत यांनी सांगितले. महाराष्ट्राबाहेर आम्ही दमदार पाऊल आधीच टाकले आहे. दादरा नगर हवेली येथे शिवसेनेचा खासदार निवडून आला आहे. हा भाजपचा गड होता आणि तो शिवसेनेने काबीज केला आहे. तिथून पुढे दक्षिण गुजरातवर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. निश्चितपणे लोकसभा निवडणुकीत राज्याबाहेरही शिवसेना आपली ताकद दाखवेल, असा विश्वास राऊत यांनी व्यक्त केला.
एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा यावेळी राऊत यांनी निषेध केला. विरोधी पक्षातील एका प्रमुख नेत्यावर राजरोसपणे पाच राऊंड गोळ्या झाडल्या जात असतील तर त्याचा अर्थ काय? तुम्ही माफियाराज संपलं म्हणता. कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी करता मग हा हल्ला कसा झाला?, असा सवाल राऊत यांनी उत्तर प्रदेशमधील योगी सरकारला केला.
Discussion about this post