व्हीएसआरएस मराठी न्युज -कर्मवीर भाऊराव पाटील हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते.
स्वावलंबनाने कष्ट करून शिका’ हा त्यांचा मंत्र होता. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. भाऊरावांनी मागास आणि गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून ‘कमवा आणि शिका’ ही योजना सुरू करून मोठे काम केले. ते जोतीराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. भाऊराव पाटील यांना 1959 साली त्यांच्या कार्याबद्दल ‘पद्मभूषण’ हा पुरस्कारही मिळाला. आज 9 मे त्यांची 63 वी पुण्यतिथी आहे. आज त्यांंच्या पुण्यतिथी निमित्त आपण त्यांंच्या एकंंदरीत आयुष्या विषयी तसेच त्यांच्या कामाबद्दल फारश्या माहित नसलेल्या गोष्टी जाणून घेणार आहोत.
कर्मवीर भाऊराव पाटील यांंचा जन्म 22 सप्टेंबर 1887 रोजी त्यांंचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज गावात शेतकरी कुटुंबात झाला. भाऊराव यांनी लहानपणापासुनच आपले आयुष्य जात-पात न पाळता असपृश्यांंसोबत आणि त्यांंच्यासाठी खर्ची घातले होते, त्यांंच्यावर राजर्षी शाहु महाराज यांंच्या कामाचा मोठा प्रभाव होता. भाऊरावांंनी दलित व अस्पृश्यांंच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण काम केले होते, कमवा आणि शिका योजना तसेच रयत शिक्षण संस्था ही त्याच कामाची उदाहरणे आहेत.
भाऊराव पाटील यांचे प्राथमिक शिक्षण विटा येथे झाले. त्यानंतर विद्यालयीन शिक्षण राजाराम हायस्कूल- कोल्हापूर येथे झाले. ते जैन बोर्डिंगमध्ये राहात होते. त्यानंतर भाऊराव सातारा येथे आले आणि त्यांनी शिकवण्या घेण्याचे काम सुरू केले. त्याच काळात त्यांनी दुधगाव शिक्षण मंडळाची स्थापना केली. त्यांना माधवअण्णा मास्तरांनी साथ लाभली. भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर यांच्या साथीने त्यांनी सर्व जाती-धर्मांच्या विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले. त्यांनी ओगले ग्लास फॅक्टरी आणि किर्लोस्कर कारखान्यात काही काळ नोकरी केली; परंतु नोकरीत त्यांचे मन रमले नाही.
4 ऑक्टोबर 1919 रोजी विजया दशमीच्या मुहूर्तावर त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना कऱ्हाड जवळच्या काले गावात केली. सन 1924 मध्ये रयतचे कार्यालय सातारा येथे हलवण्यात आले. रयत शिक्षण संस्था स्थापण्यामागील महत्त्वाचा उद्देश म्हणजे, मागासवर्गीयांमध्ये शिक्षणाबद्दल आवड निर्माण करणे, मागासवर्गीय विद्यार्थ्यांना विना फी शिक्षणाच्या संधी निर्माण करणे, सर्व जाती-धर्मांच्या मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, सामाजिक सुधारणांसाठी जुन्या प्रथा, रूढी- परंपरा, चालीरीती बंद करणे, एकत्र काम करण्यावर भर देणे आणि एकी हेच बळ याचा पुरस्कार करणे, विद्यार्थ्यांना चांगले वळण लावणे, वरिष्ठांबद्दल त्यांच्या मनात आदरभाव निर्माण करणे, विद्यार्थ्यांना स्वत:च्या पायावर उभे करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांना महत्त्वाकांक्षी बनवणे, त्यांना स्वाभिमानी बनवणे, शैक्षणिक शाखांचे विस्तारीकरण करून अनेकांना शिक्षणाच्या संधी निर्माण करणे.
Discussion about this post