मुंबई ।
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या औरंगाबादच्या भाषणानंतर आता संपूर्ण महाराष्ट्र पोलीस दल अॅक्शन मोडमध्ये आलाय. आज गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस महासंचालक रजनीश शेठ आणि अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परीषदेत महासंचालक रजनीश शेठ यांनी सांगितलं की, महाराष्ट्र पोलीस दल कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे. तसेच, आमची पूर्ण तयारी आहे.
राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्यासाठी सरकारला अल्टिमेटम दिला होता. त्या पार्श्वभूमीवर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, पोलीस कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास सक्षम आहे. तसेच, आमची पूर्ण तयारी आहे. सर्व पोलीस दलाला कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी सुस्पष्ट आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती रजनीश शेठ यांनी दिली.
याआधी समाज कंटक आणि गुन्हेगारी स्वरुपाच्या लोकांवर मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. सामाजिक एकोपा ठेवण्यासाठी स्थानिक पातळीवर अनेक बैठका घेण्यात आल्या आहेत. एसआरपीएफ, होम गार्ड यांना मोठ्या प्रमाणात संपूर्ण राज्यात तैनात करण्यात आले आहेत. कायद्याची अंमलबजावणी ही पोलिसांची जबाबदारी आहे, कोणीही कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. राज्यातील जनतेला आव्हान करतो की त्यांनी राज्यात शांतता आणि सुव्यवस्था राखावी, पोलिसांना सहकार्य करावं, असंही ते म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणासंदर्भात औरंगाबाद पोलिसांकडून संपूर्ण अभ्यास करण्यात आला आहे. त्या भाषणाच्या अनुशंगाने आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यास औरंगाबाद पोलीस सक्षम आहेत. जी कारवाई करायची आहे ते औरंगाबाद पोलीस आयुक्त करतील.
कोणीही जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कडक कारवाई होणार. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. मोठ्या प्रमाणात प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. आतापर्यंत मनसेच्या १५ हजार कार्यकर्त्यांवर प्रतिबंधातमक कारवाई करण्यात आली आहे. लोकांना नोटीसा पाठवल्या आहेत. मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात आहेत. ८७ एसआरपीएफ जवान, ३० हजाराच्या वर होमगार्ड, राज्य राखीव दलाच्या ७ तुकड्या तैनात आहेत. सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत की कोणत्याही प्रकारे तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था बिघडणार ही परवानगी कोणालाही देऊ नये, असेही आदेश देण्यात आल्याचं महासंचालकांनी सांगितलं.
Discussion about this post