व्हीएसआरएस न्युज दिल्ली-भारताचे माजी महान धावपटू मिल्खा सिंग यांची प्राणज्योत आज मालवली. मिल्खा सिंग यांना करोनाची बाधा झाली होती.
त्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे गेल्या काही दिवसांत हॉस्पिटलकडून सांगण्यात आले होते.
पण आज अखेर मिल्खा सिंग यांचे निधन झाले असल्याची बातमी एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेने दिली आहे.
मिल्खा सिंग यांची भारताचे महान धावपटू म्हणून ओळख आहे. त्यांनी आशियाई स्पर्धेत चार सुवर्ण पदक (Gold Medal) जिंकले होते. तसेच राष्ट्रकूल स्पर्धेतही विजेतेपद पटकावले. रोममध्ये 1960 साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्यांनी सर्वोत्तम कमगिरी केली. मात्र त्यांचे कांस्यपदक (Bronze Medal) अगदी थोड्या फरकाने हुकले होते.
मिल्खा सिंग यांचा जन्म २० नोव्हेबर १९२९ रोजी पाकिस्तानातील पंजाबमध्ये झाला. त्यावेळेस भारत-पाकिस्तान फाळणी झाली नव्हती. १९५८च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील २०० आणि ४०० मीटर प्रकारात त्यांनी सुवर्णपदक जिंकले होते. अशी कामगिरी करणारे ते एकमेव भारतीय खेळाडू ठरले. मिल्खा सिंग यांनी दक्षिण आफ्रिकेच्या मॅल्कम स्पेन्सला हरवून ४६.६ सेकंदात ही शर्यत पूर्ण केली. तर २०० मीटर शर्यतीत त्यांनी पाकिस्तानच्या अब्दुल खालिकचा पराभव केला. मिल्खा यांनी ही धाव केवळ २१.६सेकंदात पूर्ण केली. १९६२मधील जकार्ता एशियन गेम्समध्ये मिल्खा सिंग यांनी ४०० मीटर आणि ४x४०० मीटर रिलेमध्ये सुवर्णपदके जिंकली आहेत. १९५९मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील मिल्खा सिंग यांचा विक्रम ५० वर्षांहून अधिक काळ कायम राहिला होता. २०१० दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समध्ये कृष्णा पूनियाने डिस्कस थ्रोमध्ये सुवर्ण जिंकून हा विक्रम मोडित काढला. राजकीय नेते द्वारा मिल्खा सिंग यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
Discussion about this post