व्हीएसआरएस न्युज मुंबई -नवरात्रौत्सव साजरा करताना सर्व नागरिकांनी आरोग्याच्या दृष्टीकोनातून योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
दि. 7 ते 15 ऑक्टोबर, 2021 दरम्यान नवरात्र / दुर्गापूजा /दसरा सण साजरा करण्यात येणार आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरली असली तरी, अजूनही कोरोनाचा धोका कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी मोठ्या प्रमाणात एकत्र येऊन गर्दी करून उत्सव साजरा करणे उचित होणार नाही. त्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत.
कोविड- 19 च्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता महाराष्ट्र शासन महसूल व वन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभागाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत दिलेल्या सुधारित मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करावे. सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी मंडळांनी महापालिका / स्थानिक प्रशासन यांची त्यांचे धोरणानुसार यथोचित पूर्वपरवानगी घेणे आवश्यक राहील. कोविड- 19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता आणि महापालिका तसेच संबंधित स्थानिक प्रशासनाचे मंडपाबाबतचे धोरण यांचेशी सुसंगत असे मर्यादित स्वरुपाचे मंडप उभारण्यात यावेत.
यावर्षीचा नवरात्रौत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याच्या अनुषंगाने घरगुती तसेच सार्वजनिक देवीच्या मूर्तीची सजावट त्या अनुषंगाने करण्यात यावी. देवीच्या मूर्तीची उंची सार्वजनिक मंडळांकरिता 4 फूट व घरगुती देवीच्या मूर्तीची उंची 2 फूटांच्या मर्यादेत असावी. मागील वर्षीप्रमाणे शक्यतो देवीच्या मूर्तीऐवजी घरातील धातू/संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची/पर्यावरणपूरक असल्यास तिचे विसर्जन शक्यतो घरच्या घरी करावे. विसर्जन घरी करणे शक्य नसल्यास कृत्रिम विसर्जन स्थळी विसर्जन करण्यासंदर्भात स्थानिक प्रशासनाशी समन्वय ठेवावा.
नवरात्रौत्सवाकरिता वर्गणी/देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा, जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही असे पहावे. तसेच आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती प्रदर्शित करण्यास पसंती देण्यात यावी. तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेबाबत देखील जनजागृती करण्यात यावी. गरबा, दांडिया व इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करु नयेत. त्याऐवजी आरोग्यविषयक उपक्रमे / शिबीरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इ. आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता यांबाबत जनजागृती करण्यात यावी.
देवीच्या दर्शनाची सुविधा ऑनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करुन देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी तसेच देवीच्या मंडपांमध्ये प्रत्यक्ष येऊन दर्शन घेणाऱ्या भाविकांच्या बाबतीत सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. आरती, भजन, कीर्तन वा अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही. तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतूदींचे पालन करण्यात यावे. मंडपात एकावेळी 5 पेक्षा जास्त कार्यकर्त्यांची उपस्थिती नसावी. तसेच मंडपांमध्ये खाद्यपदार्थ अथवा पेयपानाची व्यवस्था करण्यास सक्त मनाई असेल. देवीच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. विसर्जनाच्या पारंपरिक पद्धतीत विसर्जनस्थळी होणारी आरती घरीच करून विसर्जनस्थळी कमीत कमी वेळ थांबावे. लहान मुले आणि ज्येष्ठ नागरीकांनी सुरक्षेच्या दृष्टीने विसर्जन स्थळी जाणे टाळावे. संपूर्ण चाळीतील/इमारतीतील सर्व घरगुती देवीच्या मूर्तीच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये.
महापालिका, विविध मंडळे, गृहनिर्माण संस्था, लोकप्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था इत्यादींच्या मदतीने कृत्रीम तलावांची निर्मिती करण्यात यावी. तसेच नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी स्थानिक प्रशासनाने प्रभाग समितीनिहाय मूर्ती स्वीकृती केंद्रांची व्यवस्था करावी व याबाबत जास्तीत जास्त प्रसिद्धी देण्यात यावी.
विसर्जनाच्या तारखेस जर घरगुती तसेच सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचा परिसर प्रतिबंधीत क्षेत्रात असेल तर, मूर्ती विसर्जन सार्वजनिक ठिकाणी करण्यास मनाई असेल.
दसऱ्याच्या दिवशी करण्यात येणारा रावण दहनाचा कार्यक्रम हा सर्व नियम पाळून करावा. रावण दहनाकरिता आवश्यक तेवढ्या किमान व्यक्तीच कार्यक्रमस्थळी हजर राहतील. प्रेक्षक बोलावू नयेत. त्यांना फेसबुक इत्यादी समाजमाध्यमातून थेट प्रक्षेपणाद्वारे सोहळा बघण्याची व्यवस्था करावी.
कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महापालिका, पोलीस स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष उत्सव सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत स्थानिक प्रशासनाकडून अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करणे बंधनकारक आहे.
श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवराञउत्सव पार्श्वभूमीवर शहरात जोरदार तयारी सुरू आहे. या काळात येणाऱ्या भाविकांना बसस्थानक व वाहनतळातुन थेट घाटशिळ रोडवलरील वाहन तळात यावे लागणार आहे. येथील दर्शन मंडपातुन थेट मंदीराचा दर्शन मंडपात सोडले जाणार आहे. या ठिकाणी सर्वसुविधांयुक्त तात्पुरता मंडप व स्टॉल उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. घाटशिळ वाहन तळात 80 बाय 250 फुटाचे दोन डोम वॉंटरप्रुफ स्ट्रॅंक्चलर मंडप उभारले जात आहे. या मंडपात वीस हजार भाविक थांबु शकतात.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीचा शारदीय नवरात्र उत्सव 7 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. परराज्यातील ज्या भाविकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे त्यांना जिल्ह्यात प्रवेश करताना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक नाही. मात्र लसीकरण न झालेल्या राज्याबाहेरील भाविकांना उस्मानाबाद जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तासाच्या आतला आरटीपीसीआर चाचणी अहवाल बंधनकारक करण्यात आली आहे.
शारदीय नवराञ उत्सवातील अश्विनी कोजागिरी पौर्णिमा दिनी पाच ते सहा लाख भाविक चालत येवुन देविचरणी आपला खेटा पूर्ण करतात. पण यंदा या काळात 18 ते 20 ऑक्टोबर दरम्यान जिल्हाबंदी, तर तुळजापूर शहरात भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही. या काळात सर्व प्रवेशाच्या सीमा बंद करून तिथे पोलीस व महसूल विभागाच्या अधिकारी यांचा कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे.
Discussion about this post