मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपाने आज मुंबईमधील आजाद मैदानामध्ये आयोजित केलेल्या धडक मोर्चामध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. फडणवीस यांच्यासहीत भाजपाच्या अन्य नेत्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं वृत्त आहे. मागील अनेक दिवसांपासून सुरु असणाऱ्या नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपाकडून केली जात होती. याच मागणीसाठी आज भाजपाने मुंबईत मोर्चा काढलाय. या मोर्चाला ३० ते ४० हजार लोक उपस्थित असतील असा दावा भाजपाने केलाय.
मलिक यांच्या राजीनाम्यावरुन राजकारण तापलं…
नवाब मलिक यांच्या राजीनाम्याचा विषय राज्यातील राजकारणामधील संघर्षाचा मुद्दा झालाय. भाजपाकडून सातत्याने नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. मात्र त्यावेळी दुसरीकडे महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मलिक यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच येत नाही असं म्हणत ही मागणी फेटाळून लावलीय. असं असतानाच आज भाजपाने मलिक यांच्या राजीनाम्यासाठी मुंबईमध्ये धडक मोर्चाचं आयोजन केलं आहे.
पोलिसांशी संघर्ष नको अशी भाजपाची भूमिका…
मात्र बारावीच्या परीक्षा सुरु असल्याने भाजपा कार्यकर्त्यांना पोलिसांशी संघर्ष करु नका असे आदेश देण्यात आलेत. कायदा सुव्यस्थेची परिस्थिती निर्माण होऊ बारावीच्या विद्यार्थ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या असं फडणवीस यांनी सांगितल्याचा दावा भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला. त्यामुळेच आजाद मैदानामधून मेट्रो सिनेमा मार्गे हा मोर्चा विधानभवनाकडे जाण्यास निघाला असता पोलिसांनी मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या फडणवीस यांची वाट अडवून त्यांना ताब्यात घेतलं. फडणवीस हे पोलिसांच्या व्हॅनमध्ये चढले. त्यापाठोपाठ भाजपाचे अन्य नेते ज्यामध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपा आमदार आशिष शेलार आणि अन्य नेतेही व्हॅनमध्ये चढले.
३० ते ४० हजारांची गर्दीची अपेक्षा…
भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी प्रसारमाध्यमांना या मोर्चासंदर्भात माहिती दिली. “हा (नवाब मलिकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठीचा) मोर्चा भारतीय जनता पार्टीच्या मुंबई आणि एमएमआर परिसरातून येणारा मोर्चा आहे. या मोर्चाला किमान ३० ते ४० हजार लोक अपेक्षित आहेत,” असं लाड यांनी म्हटलंय. आजाद मैदानामध्ये या मोर्चासाठी भाजपा कार्यकर्त्यांची गर्दी होण्यास सुरुवात झाली होती.
फडणवीस यांनी आदेश दिले…
“काल मुंबई पोलीस आयुक्त, मुंबई सहपोलीस आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर आम्हाला एक गोष्ट लक्षात आली, ती म्हणजे त्यांनी केलेली विनंती. मुंबईमध्ये बारावीच्या परीक्षा असल्याने भायखळ्यापासून आजाद मैदानापर्यंत मोर्चा घेऊन जाऊ नये ही विनंती त्यांनी केली. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस या मोर्चाचं नेतृत्व करत आहेत. त्यामुळे त्यांनी देखील आम्हाला आदेश दिल्याने आम्ही हा मोर्चा आजाद मैदानात करणार आहोत. आजाद मैदानाकडून पोलिसांनी परवानगी दिली तर आम्ही पुढे जाऊ,” असं लाड यांनी स्पष्ट केलंय. सकाळपासूनच आजाद मैदानावर या मोर्चाची तयारी सुरु आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलन…
नवाब मलिकांच्या राजीनाम्यासंदर्भात आज सकाळी भाजपाच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवरही आंदोलन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेमध्ये आपल्या भाषणादरम्यान मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी करत राज्य सरकारवर टीका केली.
Discussion about this post