(व्हीएसआरएस न्यूज) | देशात नवे शैक्षणिक धोरण लागू झाले असून केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून शाळेत प्रवेश प्रक्रियेसाठी बालकांचे वय निश्चित केले गेले आहे. त्यामुळे नवीन शिक्षण धोरणानुसार इयत्ता पहिलीमध्ये प्रवेशासाठी बालकांचे वय सहा वर्षे पूर्ण असणे गरजेचे आहे. सहा वर्ष पूर्ण नसल्यास विद्यार्थ्याला प्रवेश मिळणार नाही. केंद्र सरकारकडून शैक्षणिक नियमांमध्ये हा मोठा बदल करण्यात आला आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील शाळाच्या प्रवेशासाठी नवीन नियम लागू झाला आहे.
केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, मुलांच्या आयुष्यातील सुरुवातीची पाच वर्षे हे शिकण्यासाठीचा मुलभूत टप्पा आहे. देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये इयत्ता पहिलीतील प्रवेशासाठीचे वय वेगवेगळे होते. गेल्या वर्षी मार्चमध्ये लोकसभेत एका प्रश्नावर दिलेल्या माहितीनुसार, यामधील १४ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मुलांच्या पहिली इयत्तेतील प्रवेशासाठी सहा वर्षे वय असण्याचा नियम लागू नव्हता. येथे मुलांना वयाची ६ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी पहिली इयत्तेत प्रवेश घेण्याची परवानगी होती. गुजरात, तेलंगणा, लडाख, आसाम आणि पुद्दुचेरी ही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत, जिथे ५ वर्षांच्या मुलांनाही पहिल्या इयत्तेमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र आता सरकारने नवीन नियम लागू केला आहे.
Discussion about this post