पुणे | (व्हीएसआरएस न्यूज) | शिंदे-फडणवीस सरकारचापहिलाच अर्थसंकल्प काल रोजी सादर करण्यात आला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्पाचे एक तास पंचवीस मिनिटे वाचन करत अर्थसंकल्प सादर केला. अर्थमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पंचामृत बजेटमधून अनेक महत्वाच्या घोषणा केल्या. ६ हजार रुपयांची शेतकरी ‘महासन्मान योजने’ची घोषणा करण्यात आली आहे. मुलींसाठी ‘लेक लाडकी योजना’ सुरु; महिलांसाठी 50 टक्के एसटी प्रवास मोफत, तसेच राज्यात ‘मराठी भाषा विद्यापीठ’ स्थापन करणार, शिक्षण सेवकांच्या मानधनात सरासरी दहा हजार रुपयांची वाढ, ‘महात्मा फुले जन आरोग्य योजने’ची मर्यादा 5 लाख अशा घोषणा केल्या. या अर्थसंकल्पानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. एकिकडे विरोधीपक्षाने या अर्थसंकल्पावर टिका केली आहे. तर दुसरीकडे सत्ताधाऱ्यांनी अर्थसंकल्पातून सर्वांचा विचार केला असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, यावर आता शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांची या अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया समोर आली आहे.
अर्थसंकल्पातून सर्वांचा विचार…
दरम्यान, या अर्थसंकल्पातून गोरगरिबांचा, शेतकऱ्यांचा, कष्टकरी, कामगार, महिला, विद्यार्थी या सर्वांचा विचार केला आहे. तसेच या सर्वांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली गेली आहे. तर गड-किल्ले, शैक्षणिक व सामाजिक संस्था, धार्मिक संस्था व स्थळे, पायाभूत सुविधा आदींच्या निधीत वाढ केली आहे. त्यामुळं हा अर्थसंकल्प महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वांत उत्तम अर्थसंकल्प असल्याचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी म्हटले आहे.
टिका करणे विरोधकांचे कामच आहे
हा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला होता, निवडणुकीच्या धरतीवर फक्त घोषणांचा पाऊस होता. मोठमोठ्या घोषणा, अर्थसंकल्पात वास्तवाचे भान नाही, अमृत कुणीच बघितलं नाही, तर विकासाचं पंचामृत कुणालाच दिसणार नाही. घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प होता, अशी टिका विरोधकांनी केलीय, यावर बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले की, टिका करणे हे विरोधकांचे कामच आहे, टिका करणे हा विरोधकांचा राजधर्म आहे. पण असा अर्थसंकल्प यापूर्वी कधीच झाला नाही. विकासाचे मॉडेल व महाराष्ट्राला गती देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करताहेत. अर्थसंकल्पातून पुणे, पिंपरी या ठिकाणी पायाभूत सुविधा, मेट्रो तसेच रस्ते यासाठी अर्थसंकल्पात मोठी तरतूद केली आहे. त्यामुळं जरी विरोधक टिका करत असले तरी, सारासार विचार करता हा अर्थसंकल्प सामान्यांच्या हिताचा असल्याची भावना खासदार श्रीरंग बारणे यांनी ‘नवराष्ट्र’शी संवाद साधताना व्यक्त केली आहे.
Discussion about this post