व्हीएसआरएस न्युज उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मंत्री सुबोध उनियाल यांनी ही माहिती दिली.
कोरोना संसर्गाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सर्वत्र निर्बंध टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहेत. या दरम्यान, उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. चारधामला जाणार्या सर्वाधिक यात्रेकरूंच्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. त्यामुळे समस्त शिवभक्तांसाठी ही आनंदाची बातमी होय.
राज्यात मंगळवारी (15 जून) सकाळी 6 वाजता कर्फ्यू शिथिल केला जाईल. काही बदलांसह नियमावली कायम राहील.
चारधाम असलेल्या जिल्ह्यांतील रहिवाशांना निगेटिव्ह आरटीपीसीआर चाचणी अहवालासह मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. चमोली जिल्ह्यातील बद्रीनाथ धाम, रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ आणि उत्तर काशी जिल्ह्यातील गंगोत्री आणि यमुनोत्रीचे दर्शन आता घेता येणार आहे. चारधाम यात्रा खुली झाल्याच्या बातमीने पर्यटन व्यावसायिकांनी मात्र सावधगिरीने स्वागत केले. चारधाम यात्रेसाठी संचारबंदी शिथिल करून दिलेली परवानगी हा उत्तराखंड सरकारचा निर्णय कौतुकास्पद आहे. मात्र, चारधाम यात्रेवर कोरोनाचे सावट कायम राहणार आहे. सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरविल्या जात असल्याने भाविक घराबाहेर पडतील का, याबाबत अनिश्चितता आहे. मात्र, चारधाम यात्रा सुरळीत सुरू झाल्यास धार्मिक पर्यटनाला गती मिळेल, असे नाशिकच्या चौधरी यात्रा कंपनीचे संचालक रामगोपाल चौधरी यांनी सांगितले.
उत्तराखंड सरकारने चारधाम यात्रेला दिलेली परवानगी निश्चित स्वागतार्ह बाब आहे. महाराष्ट्रातून चारधाम यात्रेला जाण्यासाठी मोठ्या संख्येने भाविक उत्सुक आहेत. लॉकडाऊन संपल्यानंतर चारधाम यात्रेसाठी भाविक घराबाहेर पडतील. त्यामुळे धार्मिक पर्यटनासह अर्थचक्राला चालना मिळेल, असे ट्रॅव्हल्स व्यावसायिक दिलीपसिंग बेनिवाल यांनी सांगितले.
Discussion about this post