व्हीएसआरएस मराठी न्युज –बौद्धिकदृष्ट्या दिव्यांग व्यक्तींसाठी बर्लिन येथे झालेल्या ‘स्पेशल ऑलिम्पिक’मध्ये देशासाठी पदकांची लयलूट करणाऱ्या महाराष्ट्रातील २० खेळाडू व प्रशिक्षकांचा राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते आज राजभवन येथे सत्कार करण्यात आला.
बौद्धिक दिव्यांग मुलामुलींनी ऑलिम्पिकमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पदक प्राप्त करणे, हा राज्यासाठी तसेच देशासाठी बहुमान आहे, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पूर्वी भारत पदकतालिकेत खालच्या क्रमांकावर राहत असे. परंतु, यावर्षी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताने पदकांचे शतक पार केले आहे. आज भारत खेळामध्ये आघाडीवर येत आहे आणि त्यात दिव्यांग खेळाडू देखील आघाडीवर आहेत, ही अभिमानास्पद गोष्ट आहे, असे राज्यपालांनी सांगितले.
स्पेशल ऑलिम्पिक मध्ये भारतातून १९४ खेळाडू सहभागी झाले होते. त्यांनी देशासाठी २०२ पदके जिंकली. महाराष्ट्रातील खेळाडूंनी या स्पर्धेत २० पदके जिंकली, असे स्पेशल ऑलिम्पिक भारतच्या महाराष्ट्र अध्यक्षा डॉ मेधा सोमैया यांनी यावेळी सांगितले. स्पेशल ऑलिम्पिक मध्ये ८ वर्षांपासून ८० वर्षापर्यंत स्पर्धक सहभागी होऊ शकतात, असे त्यांनी सांगितले. बर्लिन येथे स्पेशल ऑलिम्पिक स्पर्धा जून महिन्यात झाल्या.
Discussion about this post