व्हीएसआरएस मराठी न्युज –मुंबई: दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या ८ वर्षांत १६ कोटी बेरोजगार युवकांची फसवणूक केली असल्याचा आरोप काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांनी केला. २ कोटी युवकांना रोजगार तर सोडा त्यापेक्षा अधिक युवकांच्या नोकऱ्या गेल्या, त्यासाठी तुम्ही जबाबदार नाही का? असा सवाल त्यांनी मोदी यांना विचारला.
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या अध्यक्ष पदाचा कार्यभार कुणाल राऊत यांनी शनिवारी टिळक भवन काँग्रेस मुख्यालयात स्वीकारल्यानंतर त्यांच्या
पदग्रहणानिमित्त कामगार कल्याण मैदानात आयोजित युवक काँग्रेसच्या मेळाव्यात राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या हजारो युवकांनी हजेरी लावली. यावेळी पाटील यांनी भाजप आणि मोदी सरकारविरुद्ध लढा उभारण्याचे आवाहन कॉंग्रेसजनांना केले.
यावेळी बोलताना कुणाल राऊत यांनी जात, धर्म , प्रांत, भाषेच्या नावाखाली भाजपकडून लोकांचे विभाजन केले जात असल्याचा आरोपही केला. युवक काँग्रेस महागाईविरुद्ध,मोदी सरकारविरुद्ध लढाई उभी करेल आणि यात तरुणाईने अधिकाधिक संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कुणाल राऊत उपस्थित हजारो तरुणाईच्या साक्षीने केले.जात, धर्मांधवादी नरेंद्र मोदी सरकारला सत्तेवरून खाली खेचण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
” डॉ. मनमोहनसिंह यांच्या काळात देशातील गरिबी, बेरोजगारी कमी झाली होती. मात्र, गेल्या ८ वर्षांत १९ कोटी युवकांच्या नोकऱ्या गेल्या. त्यात ३० वर्षांपेक्षा कमी असलेल्या ५ कोटी युवकांचा समावेश आहे. मोदी यांनी सत्तेवर आल्यावर सर्वसामान्य नागरिकांच्या बँक खात्यात १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिले होते. या लोकांच्या खात्यात पैसे जमा झाले का?” असा सवाल पाटील यांनी विचारला. देशातील गरिबांची संख्या वाढत असताना अब्जाधीशांच्या संख्येतही वाढ होत चालली असल्याचे त्यांनी सांगितले. देशाचे सार्वभौमत्व टिकवून ठेवण्यासाठी महात्मा गांधी, इंदिरा गांधी यांनी बलिदान दिले. स्वातंत्र्य संग्राम सैनिक, वरिष्ठ कॉग्रेस नेत्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून महाराष्ट्र युवक काँग्रेस नक्कीच चांगले काम करील, असा विश्वासही व्यक्त करीत त्यांनी कुणाल राऊत यांना शुभेच्छा दिल्या.
जातीधर्माचे राजकारण संपविणे हेच लक्ष्य
– कुणाल राऊत
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजीमहाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतिबा फुले आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या थोर राष्ट्रपुरुषांनी दिलेला वारसा जपून जातीधर्माच्या नावाखाली समाजात तेढ निर्माण करण्याचे सध्या सुरू असलेले राजकारण संपविणे, हेच आमचे मुख्य लक्ष्य राहणार असल्याचा ठाम निर्धार महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांनी पदग्रहण सोहळ्यात बोलताना व्यक्त केला. रोजगार निर्मिती, महिला सशक्तीकरण आणि संविधान संरक्षणासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले.
दादर येथील टिळक काँग्रेस भवन मुख्यालयात युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची औपचारिक सूत्रे स्वीकारल्यानंतर कामगार कल्याण मंडळाच्या मैदानावर आयोजित पदग्रहण सोहळ्यात कुणाल राऊत बोलत होते.
या मेळाव्यात प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, कॉंग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत,राष्ट्रीय सरचिटणीस शक्तीसिंह गोहिल, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप,अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास, काँग्रेसचे सहचिटणीस कृष्णा अल्लावरू,मावळते युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजीत तांबे, मुंबई युवक काँग्रेसचे अध्यक्ष झिशान सिद्दीकी, आदी नेते उपस्थित होते.
कुणाल राऊत यांच्यासह प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, शरण पाटील, अनिकेत म्हात्रे, सोनललक्ष्मी घाग, सरचिटणीस दीपाली ससाणे यांचेही पदग्रहण पार पडले.
कुणाल राऊत म्हणाले, देशात महागाई, बेरोजगारी, शिक्षण, आरोग्य यासारखे गंभीर प्रश्न निर्माण झाले असताना केंद्रातील भाजपा सरकार जाती, धर्माच्या नावाखाली समाजात दुही माजविण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणाऱ्या नेत्यांकडूनच मशिदीवरील भोंगे, हनुमान चालिसा पठण यासारखे मुद्दे काढून जातीधर्मात द्वेष पसरविण्याचे काम केले जात आहे.
एकीकडे ” बेटी पढाओ, बेटी बचाओ” असा नारा दिला जात असताना महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात ओबीसी आरक्षणावर घाला घालण्यात आला. केंद्रातील आरएसएस, मनुवादी विचारसरणीचे सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्का पोहचविण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप त्यांनी केला.
माझे गाव,माझी शाखा!
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या माध्यमातून राज्यातील सुमारे ४५ हजार गावांमध्ये ” माझं गांव, माझी शाखा” अभियान राबविण्याची घोषणा कुणाल राऊत यांनी यावेळी केली. नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी “मदतीचा हात, २४ तास” ही हेल्पलाईन सुरू केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
Discussion about this post