मुंबई । व्हीएसआरएस न्यूज ।
महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्था आणि शांततेला धोका निर्माण होण्यास सर्वस्वीपणे राज्यातील अपरिपक्व विरोधी पक्षनेताच कारणीभूत आहे, असे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले. किरीट सोमय्या यांच्यावरील हल्ल्यानंतर भाजपचे शिष्टमंडळ सोमवारी केंद्रीय गृहसचिवांना भेटायला जाणार आहे. मात्र, विरोधी पक्षाने याबाबत सर्वप्रथम मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांना भेटून त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती. पण भाजपचे नेते काही झाले तरी दिल्लीला पळतात, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते रविवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.
यावेळी संजय राऊत यांनी भाजपवर आगपाखड केली. राज्यात सरकार पोलिसांवर दबाव आणत असल्याचा आरोप भाजपचे नेते करतात. मग केंद्रीय तपासयंत्रणा आणि न्यायालय कोणासाठी काम करते? न्यायालयातील दिलासा घोटाळे कोणाच्या इशाऱ्यावर केले जातात? सरन्यायाधीश एन. रमणा यांनीही न्यायसंस्थेच्या ढासळत्या कारभाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. वकिलीची परीक्षा पास झालेल्या देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे हे म्हणणे समजवून घेतले पाहिजे. पण सत्ता गमावल्यापासून ते काहीच समजून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
शिवसैनिकांचा हल्ला, सोमय्यांच्या गाडीची काच फोडली, पोलिस स्टेशनबाहेर राडा
देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न वाटत असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांना भेटायला पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर विरोधी पक्ष आपले म्हणणे मांडतो, मुख्यमंत्री ते ऐकतात. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती, संयुक्त राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जिथे कुठे जायचे असेल तिथे जावे, अशी उपरोधिक टिप्पणी संजय राऊत यांनी केली. पण काही झालं तरी भाजपचे नेते दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहसचिव किंवा गृहमंत्र्यांना भेटतात. हा काय तमाशा लावला आहे? महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. ही गोष्ट भाजपला समजत नाही का? ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.
पुराव्यांचे कागद किरीट सोमय्यांच्या तोंडात कोंबणार: संजय राऊत
या पत्रकारपरिषदेत संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबीयांच्या युवा प्रतिष्ठानध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. युवा प्रतिष्ठानची सगळी खाती तपासली पाहिजेत. त्यांचे देणगीदार कोण आहेत, हे पाहिले पाहिजे. यापैकी बरेच देणगीदार असे आहेत की, ज्यांच्यावर ईडीच्या कारवाईची टांगती तलवार आहे. हे लोक युवा प्रतिष्ठानला पैसे देतात. मी त्यांची नावही सांगू शकतो. किरीट सोमय्या यांनी जास्त वटवट केली तर मी पुराव्यांचे कागदही त्यांच्या तोंडात कोंबेन, असेही संजय राऊत यांनी म्हटले.
Discussion about this post