व्हीएसआरएस मराठी न्युज- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शनिवारी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव असलेल्या आंबडवे गावाला भेट दिली. या ठिकाणी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी कलशाची पूजा केली आणि भगवान बुद्ध, डॉ. आंबेडकर, रमाबाई आंबेडकर आणि रामजी आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली.
राष्ट्रपतींनी आंबडवे गावात मराठीतून भाषणाची सुरुवात केली. आपणा सर्वांना माझा नमस्कार म्हणत राष्ट्रपतींनी भाषणाला सुरुवात केली. राष्ट्रपती म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाला भेट देऊन मला फार आनंद झाला. महाराष्ट्रात ६ डिसेंबरला महापरिनिर्वाण दिन साजरा केला जातो. त्याआधी २६ नोव्हेंबरला संविधान दिवस साजरा केला. त्याचप्रमाणे ७ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थी दिवस साजरा केला जातो. या दिवशी बाबासाहेब शाळेत गेले होते. त्या दिवशी एका नव्या युगाची सुरुवात झाली होती. विद्यार्थी दिवसाच्या निमित्ताने बाबासाहेबांचा आदर्श जोपासण्यात येतो. तर १४ एप्रिलला आंबेडकर जयंती साजरी केली जाते. बाबासाहेबांचे सर्व कार्यक्रम हे दयाळू, कायदेशीर नियम, समतावादी समाजाची कल्पना साकारण्यासाठी प्रेरित करतात. त्यामुळे ७ नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण देशात विद्यार्थी दिवस म्हणून साजरा करण्यात यावा यासाठी विचार करण्यात येईल. यासाठी खासदारांनी प्रयत्न करावे आणि मी तुमची यासाठी मदत करेन.
बाबासाहेबांच्या गावात यात्रा करणे हे माझ्यासाठी तीर्थयात्रेसारखे आहे. भारत सरकारद्वारे पंचतीर्थाची कल्पना मांडण्यात आली आहे आणि ती साकार होत आहे. या पंचतीर्थ संकल्पनेत मंडणगड तालुक्यातील बाबासाहेबांचे मूळ गाव आंबडवे गावाचा समावेश होईल, यासाठी देखील खासदारांनी प्रयत्न करावे. त्याचप्रमाणे आंबडवे गावातील बाबासाहेबांच्या स्मृर्ती स्थळाचा समावेश देखील त्यांच्या तीर्थस्थळांमध्ये करावा, असे राष्ट्रपती म्हणाले. नागरिकांनी या स्थळी भेट देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने योग्य सुविधा कराव्यात, अशा सूचना यावेळी राष्ट्रपतींनी दिल्या. तर आंबडवे गावातील विद्यार्थ्यांसाठी एक ग्रंथालय उभारण्याकरिता राज्यपाल विवेकानुदान निधीमधून 30 लाख रुपये निधी देण्याची यावेळी राज्यपालांनी घोषणा केली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस पालकमंत्री ॲङ अनिल परब यांनी राष्ट्रपती राम नाथ कोविंद, त्यांच्या पत्नी सविता कोविंद आणि महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे स्वागत केले. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात आंबडवे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा आणि या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्यशासन सर्वोतोपरी प्रयत्न करील, अशी ग्वाही दिली.
प्रास्ताविकामध्ये राष्ट्रीय भटके विमुक्त जाती जमाती आयोगाचे अध्यक्ष भिकू उर्फ दादा इदाते यांनी बाबासाहेबांचे बालपण, त्यांचे कर्तृत्व, त्यांचे विचार, आंबडवे गावाची पार्श्वभूमी, सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळ या शाळेच्या माध्यमातून केले जाणारे शैक्षणिक काम याविषयीचे विवेचन केले.
कार्यक्रमाची सुरुवात व सांगता पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणीचे सुप्रसिध्द निवेदक मनोज क्षीरसागर यांनी केले.
या कार्यक्रमास राष्ट्रपती भवन कार्यालयाचे वरिष्ठ अधिकारी, राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे, विभागीय आयुक्त विलास पाटील, विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, जिल्हाधिकारी डॉ. बी.एन.पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग, परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक श्री. रेड्डी, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, उपजिल्हाधिकारी अमिता तळेकर, प्रांतधिकारी प्रवीण पवार, प्रांतधिकारी शरद पवार, तहसिलदार, महसूल, पोलीस, जिल्हा परिषद तसेच प्रशासनातील इतर विभागाचे अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कुटुंबातील सदस्य, आंबडवे ग्रामस्थ कोविड नियमांचे पालन करीत उपस्थित होते.
Discussion about this post